फलटण-कोरेगावसह पाच तालुक्यांच्या पाणीप्रश्नांवर मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक — तातडीने निर्णय घेण्याचे आदेश

0
1
फलटण-कोरेगावसह पाच तालुक्यांच्या पाणीप्रश्नांवर मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक — तातडीने निर्णय घेण्याचे आदेश

मुंबई | १६ एप्रिल २०२५.  :-  आज मंत्रालय, मुंबई येथे जलसंपदा मंत्री मा. ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली फलटण-कोरेगाव मतदारसंघातील दीर्घकाळ प्रलंबित पाणी प्रश्नावर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मागणीनुसार ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत फलटण, कोरेगाव, माळशिरस, सांगोला आणि माण या पाच तालुक्यांतील विविध जलप्रकल्प आणि जलवाटप संदर्भात निर्णय घेण्यात आले.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय :

  1. कोरेगाव तालुक्यातील २६ गावांच्या पाणीप्रश्नी तोडगा – ५२ टीएमसी फेर जलनियोजनातून लाभ मिळवण्यासाठी आराखडा तयार करून मंजुरीसाठी सादर करण्याचे आदेश.
  2. नीरा देवघर उजव्या कालव्याद्वारे धोम बलकवडीला पाणीपुरवठा – उपसा सिंचन योजना वाघोशी येथे सुरू करण्याचे आदेश.
  3. माळशिरसच्या १६ नवसमाविष्ट गावांना पाणीपुरवठा – चार महिन्यात प्रक्रिया पूर्ण करून निविदा काढण्याचे आश्वासन.
  4. सांगोला तालुक्यास मंजूर पाणी वाटपाचा मार्ग मोकळा.
  5. सोळशी प्रकल्पाचा DPR दोन महिन्यांत मंत्रिमंडळ मंजुरीसाठी.
  6. धोम बलकवडी कालव्याच्या १२८-१४७ किमी भागातील वितरण नलिकांसाठी निधी लवकर उपलब्ध.
  7. कृष्णा नदीचे पुराचे पाणी वळवण्यासाठी आशियाई बँकेच्या सहकार्याने प्रस्तावित योजनेचा DPR सादर करण्याचे आदेश.
  8. शिवथर घळ येथून वाया जाणारे पाणी नीरा खोऱ्यात वळवण्यासाठी आराखडा तयार.

या बैठकीला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार सचिन पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजीबापू पाटील, डॉ. दिलीपराव येळगावकर, राम सातपुते यांच्यासह विविध पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.