फलटण: फलटण शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहतूक कोंडी आणि सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमणांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नगरपरिषदेने पाऊल उचलले आहे. मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवली जात आहे.
शहरातील मुख्य चौक, अंतर्गत रस्ते, तसेच साखर कारखाने आणि विविध उद्योगांमुळे वाढत्या ट्रक, ट्रॅक्टर, व अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
अतिक्रमण मोहीमेसाठी नियोजन
महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ अंतर्गत कलम १७९ अनुसार, सार्वजनिक रस्त्यांवरील अडथळे व अतिक्रमणे काढून टाकण्याचा अधिकार मुख्याधिकाऱ्यांना आहे. याच अधिकाराचा वापर करत, मुख्याधिकारी मोरे यांनी दोन पथकांची नेमणूक केली असून, जेसीबी मशीन, ट्रॅक्टर ट्रॉली, अग्निशमन वाहन, आणि इतर साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
लोकप्रतिनिधींचा पुढाकार
आमदार सचिन पाटील व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नागरिकांच्या तक्रारीवर लक्ष घालून त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय
फलटण शहराच्या स्वच्छता, सुंदरता, आणि वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यासाठी अतिक्रमण काढून टाकण्याची ही कारवाई महत्त्वपूर्ण आहे. पथक प्रमुखांनी अतिक्रमण हटविताना उद्भवणाऱ्या समस्यांवर तात्काळ तांत्रिक सहाय्य देण्यासाठी उपाययोजना आखल्या आहेत.
शहरातील नागरिकांना या मोहिमेमुळे वाहतूक कोंडीमुक्त रस्ते आणि स्वच्छ वातावरणाचा लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.