फलटण. :- “मा. खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार श्री सचिन पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली येत्या काही दिवसांत फलटणची बारामती झाल्याशिवाय राहणार नाही,” असा ठाम विश्वास गटनेते अशोकराव जाधव यांनी व्यक्त केला आहे.
सध्या फलटण शहरात ऐतिहासिक विकासकामे जोमात सुरू असून, यामुळे काहीसा त्रास सहन करावा लागत असला तरी, तो शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विरोधक मात्र या त्रासावरून राजकारण करत असून, जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
गेल्या अडीच ते तीन वर्षांत खासदार रणजितदादांनी शहर आणि तालुक्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणला आहे. त्यातून अनेक भव्य प्रकल्प सुरू झाले असून, नगरपरिषदेच्या शेजारी उभा राहत असलेला आधुनिक शॉपिंग कॉम्प्लेक्स हे त्याचे जिवंत उदाहरण आहे.
त्याशिवाय, महिला जिम, स्विमिंग पूल, स्टेडियम, तारांगण, पालखी मार्ग, रिंग रोडचे सुशोभीकरण, शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनची नवीन इमारत, प्रशासनिक भवन, जिल्हा न्यायालय व वारकरी भवन अशी अनेक कामे प्रगतीपथावर आहेत.
“ही सर्व कामे पूर्ण झाली की फलटणचा चेहरामोहराच बदलून जाईल. त्यामुळे विरोधकांना पोटशूळ होत आहे,” असे म्हणत अशोकराव जाधव यांनी सर्व फलटणकर नागरिकांना या विकासयात्रेत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले आहे.