
पहलगाम / सोलापूर – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील माढा व पंढरपूर तालुक्यांतील ४७ हून अधिक कुटुंबीय तिथे अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अडकलेल्या नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांची सांत्वनपूर्वक विचारपूस केली.
ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना तातडीने परत आणण्यासाठी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी संपर्क साधून विशेष विमानाची व्यवस्था करण्यासंबंधी सकारात्मक चर्चा केली. “घाबरू नका, आम्ही सर्वजण सुरक्षितरित्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करत आहोत,” असे भावनिक आवाहन पालकमंत्र्यांनी नातेवाईकांना केले.
या संवादावेळी माढ्याचे आमदार अभिजीत पाटील, सातारा जिल्हा भाजपा अध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांच्यासह अन्य मान्यवरही उपस्थित होते.




