फलटण :- पहलगाम, जम्मू-काश्मीर येथे घडलेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात २८ निष्पाप भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. विशेषतः पुरुष पर्यटकांना नाव विचारून टार्गेट करून गोळ्या झाडण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अमानुष घटनेने भारतात दुःखाची आणि संतापाची लाट उसळली आहे.
या पार्श्वभूमीवर देशभर तसेच महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये निषेध आंदोलन आणि बंद पुकारण्यात आले आहेत. फलटण तालुक्यातही मुस्लिम युवकांनी एकत्र येऊन पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला. त्यांनी निषेध मोर्चाचे आयोजन करून हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच देशविघातक प्रवृत्तींचा कठोर शब्दांत निषेध करत भारताविषयी असलेले प्रेम व राष्ट्रीय एकात्मतेची भक्कम भावना व्यक्त केली.
या निषेध मोर्चात फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक आसिफ उर्फ बाळासाहेब मेटकरी, पैलवान पप्पूभाई शेख, पैलवान मेहबूब मेटकरी, जमशेदभाई पठाण, सामाजिक कार्यकर्ते रियाज इनामदार, शाकीरभाई महात, सादिक भाई बागवान, पै. वसीम मणेर, निजामभाई आतार, इमरान कुरेशी, हैदर मेटकरी आदींसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
फलटण तालुक्यामध्ये हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये कायमच जातीय सलोखा आणि बंधुभाव टिकून आहे. यावेळीही सर्व समाजबांधवांनी एकत्र येत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.
दरम्यान, या भीषण हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पाकिस्तानसोबत असलेल्या सिंधू जल कराराला स्थगिती देण्याचा मोठा निर्णय भारताने घेतला आहे. भारतातून पाकिस्तानला सिंधू नदीच्या पाण्याचा प्रवाह थांबविण्यात आला असून त्यामुळे पाकिस्तानमधील पंजाब व सिंध प्रांतातील शेतीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखी तणावपूर्ण झाले आहेत.