फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार दीपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ पिंपोडे बु. (ता. कोरेगांव) येथे नुकत्याच आयोजित सभेत राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. या सभेत डॉ. कोल्हे यांनी दीपक चव्हाण यांच्या उमेदवारीसाठी आपला संपूर्ण पाठिंबा जाहीर करत त्यांच्या ओरिजिनल व्यक्तिमत्त्वावर विश्वास व्यक्त केला. “आपल्याला आपलं नाव किंवा आडनाव बदलायची गरज नाही. आपण ओरिजिनल आहोत, आणि ओरिजिनल माणसाला लोक साथ देतात,” असं सांगत कोल्हे यांनी दीपक चव्हाण यांच्या विजयाची खात्री वर्तवली.
सभेच्या अध्यक्षस्थानी असलेले खासदार कोल्हे यांनी महाराष्ट्रात मराठी माणसांनी उभे केलेले पक्ष दिल्लीतील नेत्यांनी फोडल्याचे खंत व्यक्त केली. “चोरीची वस्तू अभिमानानं मिरवता येत नाही. आपल्या शरद पवारांचा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह चोरलेलं आहे, आणि ते घड्याळ बंद पाडण्याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे,” असेही त्यांनी सांगितले.
डॉ. कोल्हे यांनी महायुतीच्या सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे आता विधानसभा निवडणुकीपूर्वी ते महाराष्ट्राच्या जनतेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांचे आत्महत्या दर वाढत आहेत, आणि त्यांची मागणी प्रलंबित राहिली आहे. आमच्या सोयाबीनला भाव, दुधाला योग्य दर, रोजगार, आणि महागाईवर नियंत्रण असणे आवश्यक आहे,” असे सांगत त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर कडक शब्दांत प्रहार केला.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण आणि शेतकऱ्यांच्या विरोधात चालवलेले धोरण पाहता, महायुतीचे सरकार हद्दपार करण्याची वेळ आल्याचे खासदार कोल्हे यांनी ठणकावले.