मांगल्याचा नंदादीप — नंदा बाईंच्या स्मृतीसाठी पर्यावरणपूरक संकलन उपक्रम 🌿

0
38
मांगल्याचा नंदादीप — नंदा बाईंच्या स्मृतीसाठी पर्यावरणपूरक संकलन उपक्रम 🌿

🌿 मांगल्याचा नंदादीप — नंदा बाईंच्या स्मृतीसाठी पर्यावरणपूरक संकलन उपक्रम 🌿

फलटण, ६ नोव्हेंबर: निंबुत गावातील बबई व केरबा बनसोडे यांची ज्येष्ठ कन्या नंदा रमेश काकडे यांचा अचानक हृदयविकाराने निधन झाले. संस्कार, प्रेम आणि संवेदनांचा अद्भुत संगम असलेली नंदा बाई, आई, पत्नी, सासू आणि आजी या सर्व भूमिकांत उत्कृष्ट होती. त्यांनी आपले प्रेम, सेवा भाव आणि नातेसंबंधांचा आदर्श सर्वांनाच दिला होता.

पुण्यात स्थायिक झालेल्या काकडे कुटुंबात नंदा बाईंच्या प्रेमळ स्वभावामुळे घरातील प्रत्येक सदस्य आनंदी राहायचा. शेजारी रफिक, आसिफ त्यांच्या लहान भावांसारखे झाले तर गोखले कुटुंबातील लीना वीना मुलींनी सारखे तर जोगांचा श्रीपाद मुलासारखा मानला. पती रमेश काकडे यांच्यासोबत त्यांनी आदर्श कुटुंब उभे केले आणि तीन मुलांना उत्तम संस्कार व शिक्षण दिले. पतीच्या अकाली निधनानंतरही नंदा बाई संपूर्ण कुटुंबाचा आधार ठरली.

त्यांच्या स्मृती जपण्यासाठी भिमराव (आण्णा) व राजकुमार बनसोडे यांनी एक अद्वितीय आणि पर्यावरणपूरक निर्णय घेतला — नंदा बाईंच्या अस्थी माहेरी असलेल्या बागेत, वडिलांच्या समाधीजवळील आंब्याच्या झाडाखाली अर्पण केल्या. ही कृती केवळ पारंपरिक विसर्जनाचा पर्याय न वापरता, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ठरली.

या उपक्रमात पारंपरिक अंधश्रद्धा किंवा विशिष्ट दिवसाशी मर्यादित प्रथा न पाळता, बौद्ध धम्माच्या दृष्टिकोनातून विज्ञानाधिष्ठित पद्धतीने अस्थी संकलन करून बोधिवृक्ष, आंबा यांची रोप लावण्यात आली. या कृतीने जलप्रदूषण टाळून, पर्यावरण संवर्धनाचा आदर्श समाजासमोर ठेवला.

भिमराव आणि राजकुमार यांनी नंदा बाईंच्या स्मृतीला हिरव्या व जीवनदायी स्वरूपात जतन करून समाजाला प्रेरणादायी उदाहरण दिले. या कार्यक्रमात भन्ते एस प्रियदर्शी, माजी श्रामणेर दादासाहेब गायकवाड (पुरंदर ) तसेच मुले विशाल, प्रविण, अमोल, सुना, निलम, वैशाली, स्नेहा व नातंवडया तसेच पंचशील समता संघ धायरी . नातेवाईक सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम पार पडला

नंदा बाईंच्या आठवणी आता त्या आंब्याच्या झाडातून, त्यांच्या संस्कारांतून आणि त्यांच्या प्रेमळ स्वभावातून कायम जिवंत राहतील. त्यांच्या जीवनाचा दीपस्तंभ कधीच विझणार नाही — हा मांगल्याचा नंदादीप समाजासाठी प्रेरणास्त्रोत ठरला आहे.

“अस्थींचे विसर्जन नद्या किंवा समुद्रात न करता वृक्षारोपणाद्वारे पर्यावरणाला जीवनदान द्या”, हा संदेश या उपक्रमातून समाजासमोर ठसठशीतपणे ठेवण्यात आला आहे.

गुंजनारा आवाज तुझा एकाएकी कुठे गेला शोधायचे तुला आता कसे जीव व्याकूळ ग झाला…

हसरी प्रसन्न मुद्रा तुझी आता फक्त फोटोत दिसेल समोर तू येणार नाहीस ही गोष्ट मनाला कायम सलेल…

मनाने निर्मळ आरशासारखी तू तुझ्या स्वभावाने माणसे गेलीस जोडून अशी कशी घेतलीस अचानक रजा भरल्या जगात आम्हाला पोरके करून?

छत्र छाया होतीस तू तुझ्या असण्याचा आधार होता तुझ्या सुनंदा नावातच आमचा सगळ्यांचा गाव होता…

सगळ्यांशी जुळले सुर तुझे ज्येष्ठ समवयस्क आणि सान मोठेपण न मिरवताही नेहमीच मिळवला तो मान …