
माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी, भोजपुरी कलाकार मनोज तिवारी व निरहुआ, माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि मनोहरलाल खट्टर यांच्यासह तीन केंद्रीय मंत्री व तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या नशिबाचा फैसला या टप्प्यात ईव्हीएममध्ये कैद होणार आहे. या 58 जागांवर 889 उमेदवार रिंगणात आहेत.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) सहाव्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात होत आहे. 8 राज्यांतील एकूण 58 जागांवर हे मतदान होत आहे. मतदान होत असलेल्या जागांपैकी सर्वाधिक 14 जागा उत्तर प्रदेशातील असून, दिल्लीतील सर्व 7 आणि हरियाणातील सर्व 10 जागांवर या टप्प्यात मतदान होत आहे.
2019 मध्ये या 58 जागांपैकी 40 जागांवर भाजपचे खासदार निवडून आले होते. त्याखालोखाल 4 जागा बसपला मिळाल्या होत्या. काँग्रेसला यात एकही जागा नव्हती. विशेष म्हणजे तिसऱ्या टप्प्यात मतदान निर्धारित असलेल्या व नंतर पुढे ढकललेल्या जम्मू-काश्मिरातील अनंतनाग-राजौरीतही या टप्प्यात मतदान होणार आहे.