
रत्नागिरी-कोल्हापूरसाठी रेड अलर्ट –
राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोकण व पश्चिम महाराष्ट्रात रविवारी सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. रत्नागिरी, रायगडमध्ये प्रशासन अलर्ट मोडवर असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हवामान विभागाने रत्नागिरी, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट दिला असून रायगड सिंधुदुर्ग, पुणे, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबई, ठाणे, पालघर, सांगली, सोलापूरला यलो अलर्ट दिला असून सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे.