– ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत विशेष अंकाचे प्रकाशन; 5 कोटींच्या निधीची घोषणा
कटगुण, ता. खटाव, जि. सातारा | शुक्रवार, ११ एप्रिल २०२५ :- कटगुणच्या भूमीत विचारांचा जागर झाला, तेव्हा ‘क्रांतीसूर्य महात्मा फुले’ यांच्या तेजस्वी कार्याचा सन्मान मोठ्या उत्साहात करण्यात आला. शुक्रवार, ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य उत्सवाला ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे उपस्थित राहिले.
महात्मा फुले यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करत त्यांनी ‘साप्ताहिक वंदनसृष्टी’चा जयंती विशेष अंक प्रकाशित केला. उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधत त्यांनी महात्मा फुलेंच्या शिक्षण, समता आणि सत्यासाठीच्या लढ्याचे स्मरण करून दिले.
“महात्मा फुले यांची जन्मभूमी असलेल्या कटगुण गावाला लवकरच ब वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून, स्मारकाच्या विकासासाठी ५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. लवकरच कामाची सुरुवात होणार आहे,” अशी माहिती व आश्वासन गोरे यांनी दिले.
कार्यक्रमात भाजपा कार्यकारिणी सदस्या सौ. प्रियाताई महेश शिंदे, युवानेते अंकुश गोरे (भाऊ), सौ. भारतीताई गोरे, वडूज नगराध्यक्ष सौ. रेश्मा श्रीकांत बनसोडे, संजय कर्पे, अमृतराव काळोखे, प्रताप गोरे, तसेच महात्मा फुले ट्रस्ट कटगुणचे पदाधिकारी, गोरे कुटुंबीय व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.