
पंढरपूरहून आषाढी वारी करून काही वारकरी जालनामार्गे जीपमध्ये बसून राजूरकडे जात होते. भरधाव वेगातील जीप वसंतनगर शिवारात आली असता समोरून आडवी आलेल्या मोटारसायकलली चुकवण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली. मोठा आवाज झाल्याने शेतात काम करणारे शेतकरी व कामगारांनी तातडीने विहिरीकडे धाव घेत विहिरीत पडलेल्या वारकऱ्यांना बाहेर काढायला सुरुवात केली. सायंकाळी उशिरापर्यंत बचावमोहीम सुरू होती. सहा जणांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी पोलिस अधिकारी, अग्निशमन दलाचे जवानही दाखल झाले आहेत.