
पुढारी ऑनलाईन डेस्क : Ishan Kishan : आयपीएल 2024 च्या 25 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचा सात विकेट्सने पराभव केला. ईशानने 34 चेंडूत 69 धावा करत मुंबईला 197 धावांचे आव्हान पार करण्यात मोलाची भूमिका बजावली. सामन्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ईशानने आयपीएल सुरू होण्याच्या काही आठवड्यांपूर्वी झालेल्या बीसीसीआयविरुद्धच्या वादावर प्रतिक्रिया दिली. वास्तविक, ईशानला बीसीसीआयने केंद्रीय करारातून काढून टाकले होते. तसेच बीसीसीआयच्या इशाऱ्यानंतरही तो रणजी ट्रॉफी खेळला नाही. अशा स्थितीत भारतीय संघातील त्याच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
यावरून विचारलेल्या प्रश्नावर ईशानने सांगितले की, ‘मी खेळातून थोडा वेळ स्वतःसाठी काढला तेव्हा लोक खूप बोलत होते. सोशल मीडियावरून माझ्यावर टीका करण्यात आली. पण अनेक गोष्टी खेळाडूंच्या हातात नसतात हे समजून घ्यावे लागेल. मात्र मी सराव करत राहिलो. सध्या आयपीएल खेळत असल्याने त्यातील एका-एका सामन्याचा विचार करत आहे. ही एक मोठी स्पर्धा आहे आणि त्यात तुम्हाला ओव्हरस्टेप करायचे नसते. मुंबई इंडियन्स संघासाठी उपयुक्त खेळी करणे हे माझे ध्येय आहे.’
ब्रेक दरम्यान माझ्या मानसिकतेत मोठा बदल झाला. खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. जेव्हा करिअरमध्ये सर्वकाही चुकीचे होते तेव्हा ती परिस्थिती कशी हाताळायची हे शिकलो. वेळेचा योग्य वापराविषयीचे धडे गिरवले, असाही खुलासा इशानने यावेळी केला.
इशान विरुद्ध बीसीसीआय वाद नेमका काय आहे?
या वर्षाच्या सुरुवातीला ईशानने दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेतून अचानक माघार घेतली होती. तो थेट भारतात परतला. या मागे मानसिक थकवा हे कारण असल्याचे समोर आले. यानंतर, त्याने अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी किंवा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी स्वतःला उपलब्ध घोषित केले नाही. अशा परिस्थितीत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी इशानला भारतीय संघात परतण्यासाठी रणजी ट्रॉफी खेळण्याचा सल्ला दिला होता. मात्र, सल्ल्याकडे इशानने दुर्लक्ष करत कर्णधार हार्दिक पंड्यासोबत आयपीएलची तयारी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बीसीसीआयने ईशान आणि श्रेयस अय्यरला बीसीसीआयच्या वार्षिक करारातून वगळले.






