
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी इक्बाल सिंह चहल यांना मुंबईच्या आयुक्तपदावरून हटवलं होतं. आता त्यांची नियुक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिरिक्त सचिव म्हणून करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एका पदावर, जिल्ह्यात किंवा मूळ गाव असलेल्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या निवडणुकीच्या कामाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश आयोगाने दिले होते. या आदेशानुसार इक्बालसिंह चहल, अश्विनी भिडे आणि पी.वेलारासू यांची बदली करणं बंधनकारक झालं. इक्बाल सिंह चहल यांना अपवादात्मक स्थितीत मुंबई पालिका आयुक्तपदावर कायम ठेवण्यात यावं अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. ती मागणी आयोगाने फेटाळली होती.





