
साहस Times :- राजकारण, सहकार, शिक्षण आणि साहित्य या विविध क्षेत्रांत काम करणारे डॉ. कृष्णचंद्र भोईटे हे फलटण तालुक्याच्या सार्वजनिक जीवनातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या कार्यातून ग्रामीण विकास, लोकशाही मूल्ये आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम दिसून येतो.
त्यांच्या 88 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला आणि विचारांना विनम्र अभिवादन.
फलटण तालुक्याच्या राजकीय, सामाजिक, सहकारी आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. कृष्णचंद्र भोईटे. समाजातील गुणी माणसे शोधून त्यांना संधी देत त्यांचा विकास घडवून आणण्याची वृत्ती ज्यांच्यात होती, अशा निष्ठावान सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.
प्रारंभिक जीवन व शिक्षण
डॉ. कृष्णचंद्र भोईटे यांचा जन्म ७ मार्च १९३७ रोजी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील आरडगाव येथे झाला. इतिहासपरंपरा लाभलेल्या या गावाशी त्यांची नाळ आयुष्यभर जुळलेली राहिली. शिक्षणाबद्दलची ओढ आणि समाजकारणाची जाणीव या दोन गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सुरुवातीपासून दिसून येत होत्या.
पुणे विद्यापीठातून त्यांनी राज्यशास्त्र विषयात एम.ए. (१९६४) पदवी संपादन केली. पुढे महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेच्या अभ्यासावर त्यांनी संशोधन करून “Democratic Decentralisation in Maharashtra with special reference to Satara District” या विषयावर पुणे विद्यापीठातून पीएच.डी. मिळवली. लोकशाहीचे विकेंद्रीकरण आणि ग्रामीण प्रशासन याविषयी त्यांना विशेष अभ्यास होता.
पंचायत राज व्यवस्थेतून नेतृत्वाची सुरुवात
महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर ग्रामीण नेतृत्वाला नवी दिशा मिळाली. याच काळात डॉ. भोईटे यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली.
१९६२ साली आरडगाव ग्रामपंचायत स्थापन झाल्यानंतर ते पहिले सरपंच म्हणून निवडून आले. त्याच वर्षी स्थापन झालेल्या फलटण तालुका पंचायत समितीचे ते पहिले सभापती (१९६२–१९६७) झाले.
या कालावधीत त्यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी अनेक महत्त्वाची कामे राबवली. पिण्याच्या पाण्याच्या योजना, प्राथमिक शाळांच्या इमारती, नाला बंडिंग, पाझर तलाव, रस्त्यांवरील दिवे अशी अनेक कामे प्रभावीपणे राबवली गेली. त्या काळात फलटण पंचायत समितीचे कामकाज आदर्श मानले जाऊ लागले. त्यांच्या या कार्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि ग्रामीण विकास मंत्री गोपाळराव खेडकर यांनीही त्यांचे कौतुक केले होते.
विधानसभेतील प्रभावी कारकीर्द
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील यशस्वी कामगिरीमुळे डॉ. भोईटे यांना मोठ्या राजकारणात संधी मिळाली.
१९६७ ते १९७२ आणि १९७२ ते १९७८ या दोन कार्यकाळात ते फलटण-खंडाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले. काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी सुमारे ११ वर्षे विधानसभेत काम केले.
विधानसभेत त्यांनी विविध समित्यांवर काम करत अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण मते मांडली. मुद्देसूद भाषणांमुळे ते अभ्यासू आणि तरुण आमदार म्हणून ओळखले जात. फलटण तालुक्यातील शेती, पाणी आणि ग्रामीण विकासाशी संबंधित अनेक प्रश्न त्यांनी प्रभावीपणे मांडले.
फलटण परिसरातील शेतीसाठी पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी शासनाला धोरणात्मक निर्णय घेण्यास भाग पाडले. निरा उजव्या कालव्यालगत असलेल्या परंतु पाणी न मिळणाऱ्या हजारो एकर जमिनींसाठी लिफ्ट सिंचन योजना राबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तसेच काही शेतकऱ्यांना शेती महामंडळाकडे गेलेल्या जमिनी परत मिळवून देण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले.
सहकार क्षेत्रातील योगदान
राजकारणाबरोबरच सहकार क्षेत्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण काम केले. फलटण तालुक्यातील अनेक सहकारी संस्थांच्या उभारणीत त्यांचा सक्रिय सहभाग होता.
त्यांच्या पुढाकारातून फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघाची स्थापना १९७६ मध्ये झाली. या संघाच्या माध्यमातून तालुक्यात १०० पेक्षा अधिक दूध सोसायट्या स्थापन झाल्या. छोट्या शेतकऱ्यांना जर्सी गायी खरेदीसाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी त्यांनी सहकारी व राष्ट्रीयीकृत बँकांच्या माध्यमातून प्रयत्न केले. त्यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना दुधाचा जोडधंदा मिळाला.
याचबरोबर दि. यशवंत को-ऑप. बँक या संस्थेच्या स्थापनेतही त्यांचा सहभाग होता. तसेच महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयाचे ते जवळपास २० वर्षे संचालक होते. सहकार चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
१९८४ साली श्रीराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक “डॉ. कृष्णचंद्र भोईटे पॅनेल”च्या नावाने जिंकून त्यांनी कारखान्याच्या कामकाजातही महत्त्वाची भूमिका बजावली.
शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील सहभाग
डॉ. भोईटे यांचे योगदान केवळ राजकारणापुरते मर्यादित नव्हते. शिक्षण क्षेत्रातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
ते शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटवर तीन वेळा निवडून आले तसेच पुणे विद्यापीठाच्या सिनेटवरही त्यांची निवड झाली. स्थानिक श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटण एज्युकेशन सोसायटी या संस्थांमध्ये त्यांनी सचिव व नियामक मंडळ सदस्य म्हणून काम केले. मुधोजी कॉलेज कमिटीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.
साहित्याचीही त्यांना आवड होती. त्यांच्या कविता आणि लेख विविध मासिकांमध्ये प्रसिद्ध झाले. “अस्मिता” हा त्यांचा काव्यसंग्रह १९६० साली प्रकाशित झाला होता.
साधेपणाने जगलेले नेतृत्व
सत्ता आणि पद ही साधने मानून समाजासाठी काम करणे ही त्यांची भूमिका होती. सत्ता असूनही सत्तेचा मोह न बाळगता समाजहितासाठी काम करणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. आमदारकी संपल्यानंतरही अनेक वर्षे त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांचा आणि सर्वसामान्यांचा विश्वास टिकून राहिला.
आयु. सोमीनाथ पोपट घोरपडे, संस्कार सचिव
भारतीय बौध्द महासभा शाखा सातारा जिल्हा(पूर्व)
मोबाईल नं : 9284658690








