भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे क्रीडा विश्वातही खळबळ उडाली असून, इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL) बीसीसीआयने अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहे. IPL मधील पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील गुरुवारचा सामना रद्द झाल्यानंतरच स्पर्धेवर संकटाचे ढग निर्माण झाले होते. अखेर, सर्व परिस्थितीचा विचार करून बीसीसीआयने संपूर्ण हंगाम थांबवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाची अधिकृत घोषणा लवकरच बीसीसीआयकडून होणार असून, सर्व परदेशी खेळाडूंना सुरक्षितपणे त्यांच्या देशात परत पाठवले जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे.
या हंगामात एकूण 74 सामने खेळवायचे होते. गुरुवारी धर्मशाळा येथे रद्द झालेला सामना हा 58 वा सामना होता, म्हणजे अद्याप 16 सामने बाकी आहेत. मात्र, देशातील सुरक्षा परिस्थिती लक्षात घेता IPL चा पुढील भाग सध्या थांबवण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.
सध्या भारताने काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले आहे. यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव अधिकच तीव्र झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या तसेच खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने बीसीसीआयने हा निर्णय घेतला.
“सीमावर्ती परिस्थिती रोज बदलते आहे. आम्हाला जे सांगितले जाईल तेच आम्ही करू. सध्या आमची प्राथमिकता खेळाडू, चाहते आणि भागधारकांची सुरक्षा आहे,” असे IPL संचालन मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले.
हायलाइट्स:
- IPL 2025 हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित
- 58 सामन्यांनंतर स्पर्धेला ब्रेक; अजून 16 सामने शिल्लक
- पाकिस्तानशी वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
- परदेशी खेळाडूंना सुरक्षित परत पाठवणार: बीसीसीआय
- अधिकृत घोषणा लवकरच अपेक्षित