
पुढारी ऑनलाईन डेस्क : India A Won : भारत अ संघाने चमकदार कामगिरी करत दुसऱ्या अनौपचारिक कसोटीत इंग्लंड लायन्सचा एक डाव आणि 16 धावांनी पराभव केला. या विजयासह भारत अ संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. यजमान भारतीय संघाने दुसऱ्या डावात इंग्लंड लायन्सचा डाव 321 धावांत गुंडाळला. अर्शदीप सिंग (2/62) आणि यश दयाल (1/37) यांनी अनुक्रमे ऑली रॉबिन्सन (85) आणि टॉम लॉज (32) यांचे बळी घेतले.
पाहुण्या इंग्लंड लायन्स संघाने 8 बाद 304 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली, मात्र अवघ्या 5.2 षटकांत अर्शदीपने रॉबिन्सनला यष्टिरक्षक उपेंद्र यादवकरवी झेलबाद केले. त्यानंतर लॅव्हसही बाद झाला. दयालने त्याला आकाशदीपकडे झेलबाद केले. सरफराज खानला (161) सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. भारत अ संघाने पहिल्या डावात 489 धावा केल्या होत्या.
डावखुरा फिरकी गोलंदाज सौरभ कुमारने कारकिर्दीत 22व्यांदा एका डावात पाच विकेट्स घेतल्या. 341 धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर इंग्लंड लायन्सने दुसऱ्या डावात 8 बाद 304 धावा केल्या होत्या. इंग्लंडचा संघ डावाचा पराभव टाळेल, असे एकेकाळी वाटत होते, पण तसे झाले नाही. यष्टीरक्षक ऑलिव्हर रॉबिन्सन (नाबाद 84) आणि ब्रेडेन कारसे (38) यांच्यातील सातव्या विकेटसाठी 102 धावांच्या भागीदारीच्या जोरावर लायन्सने सामना चौथ्या दिवसापर्यंत खेचून आणला. तिसऱ्या दिवशी आकर्षणाचा केंद्रबिंदू सौरभ होता जो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 300 बळी घेण्याच्या जवळ आहे. त्याने 29 षटकांत 104 धावा देत पाच बळी घेतले.






