फलटण प्रतिनिधी उमेश काकडे :- फलटण तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे व अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे, शेतजमिनीचे, घरांचे आणि जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबत तात्काळ पंचनामे करून मदतीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत.
तहसीलदारांनी दिलेल्या आदेशानुसार, संबंधित विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपल्या अधिनस्त गावांमध्ये तात्काळ जाऊन नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून संयुक्त पंचनामे करावेत.
या कामात जर कोणत्याही कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा अथवा कुचराई केली, तर त्यांच्यावर “नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005” मधील कलम 51 ते 56 अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
पंचनाम्यांची माहिती सॉफ्ट कॉपी आणि हार्ड कॉपी स्वरूपात तात्काळ तहसील कार्यालयात जमा करण्याच्या सूचनाही या आदेशात देण्यात आल्या आहेत.