हिम्मत असेल तर नाव घ्या; मग बघतो, फलटणमध्ये कसा राहतोस” — आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा विरोधकांवर घणाघात

0
45
हिम्मत असेल तर नाव घ्या; मग बघतो, फलटणमध्ये कसा राहतोस” — आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा विरोधकांवर घणाघात

फलटण, प्रतिनिधी: “मला विविध प्रकरणात अडकवण्याचे प्रयत्न विरोधकांनी वारंवार केले. आजही महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मला मास्टरमाइंड म्हणत प्रश्न विचारले जात आहेत. हिंमत असेल तर नाव घ्या, मग बघतो, फलटणमध्ये कसे राहता ते!” असा इशारा विधान परिषदेचे माजी सभापती व आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला.

फलटण येथील शानिनगर परिसरातील विकासकामांच्या लोकार्पणप्रसंगी आयोजित सभेत ते बोलत होते. या कार्यक्रमाला जि.प.चे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

रामराजे म्हणाले, “विरोधकांच्या पापांमुळे फलटणचे नाव बदनाम होत चालले आहे. कोणाला अडकवा, त्याला अडकवा — अशा कारवायांनी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मी सभापती असताना मला अडकवण्याचा प्रयत्न झाला, पण विरोधकांचा डाव फसला. सूडबुद्धीचे राजकारण करणे एवढेच त्यांच्याकडे उरले आहे.”

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाबद्दल ते म्हणाले, “त्या घटनेच्या वेळी मी पुण्यात होतो. ती घटना अतिशय दुर्दैवी आहे, पण त्यामुळे फलटणची बदनामी झाली. यासाठी पूर्णपणे विरोधक जबाबदार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी एसआयटी नेमल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.”

सभेत त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता थेट टीकेची झोड उठवली. “हिम्मत असेल तर मास्टरमाइंडचे नाव घ्या. मग १९८५ पासूनचा सगळा इतिहास बाहेर काढतो. तुरुंगात टाका म्हणताय, टाका ना! मग बघतो, तू कसा फलटणमध्ये राहतोस. तुरुंगातूनही तुला थड लावीन,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना थेट ललकारले.

रामराजे पुढे म्हणाले, “आमच्या चुका झाल्या असतील, पण अशा लोकांना राजकारणात येऊ देऊ नका. फलटण तालुक्यात चार कारखाने आहेत, मग तिथे वाद झाले नाहीत, फक्त तुमच्याचकडे का झाले? बीड जिल्ह्यात तुमची जहागिरी होती, तिथे काय झाले? ती डॉक्टर व्यवस्थेची बळी होती, पण तुम्ही तिच्या मृत्यूचा वापर राजकारणासाठी करत आहात.”

त्यांनी तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या चौकशीची मागणी केली. “इतका हलकट माणूस आपल्याला मिळाला, त्याचीही चौकशी व्हायला हवी. प्रांत अधिकारी मॅडम यांनाही सांगतो — तुमची वेळही राहुल धससारखी येऊ शकते,” असा इशारा देत त्यांनी प्रशासनालाही लक्ष्य केले.

रामराजे यांनी फलटण व साखरवाडी साखर कारखान्यांच्या कामकाजाबाबत चिंता व्यक्त केली. “फलटण तालुक्याची प्रतिमा मलिन झाली आहे. अशा वातावरणात नवीन उद्योग येतील का? मुकादम येतील का? हे तुम्हीच ठरवा,” असे ते म्हणाले.

सभेच्या शेवटी त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले, “मी कोणाला घाबरत नाही. तुमच्यासाठी ही लढाई शेवटपर्यंत लढणार आहे. गेल्या पाच वर्षांत विरोधकांनी सत्तेचा जो गैरवापर केला, तो आता थांबवणे आवश्यक आहे. जनता जागी झाली पाहिजे आणि सन्मानासाठी लढा दिला पाहिजे.”