
सातारा प्रतिनिधी :- सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्षांनी शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसैनिकांना योग्य सन्मान द्यावा, अशी ठाम भूमिका पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी मांडली. आत्मसन्मान राखला गेला आणि जागावाटपाच्या वाटाघाटी यशस्वी झाल्या, तर महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचा विचार होईल. मात्र सन्मान नसेल, तर शिवसेना स्वबळावर किंवा इतर पर्यायांचा विचार करेल, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.
साताऱ्यात नुकत्याच पार पडलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेच्या मेळाव्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना देसाई बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार महेश शिंदे, संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपकराव चव्हाण, नगराध्यक्ष राजेंद्र यादव, जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोर गटाच्या जिल्हा संपर्कप्रमुख रेशमाताई जगताप यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
देसाई म्हणाले की, महायुतीतील घटक पक्ष म्हणून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील जागावाटपात शिवसेनेला प्राधान्य मिळाले पाहिजे. तिन्ही घटक पक्षांनी सन्मानाची वागणूक दिली तरच एकत्र निवडणूक लढवली जाईल. अन्यथा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला जाईल. जागावाटपासाठी आमचे सर्व चर्चेचे पर्याय खुले असून, जो समविचाराने चर्चा करेल, त्याच्याशी राजकीय समीकरणांचा विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पालिका निवडणुकीप्रमाणे जर यावेळी महायुती झाली नाही, तर शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल. कराड पालिकेप्रमाणे पूर्ण ताकदीने आणि आपल्या पद्धतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांना सामोरे जाण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. फलटण पालिकेत काही अंदाज चुकल्याने अपयश आल्याचे त्यांनी मान्य केले.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) किंवा भाजपकडून अद्याप कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नसल्याचेही देसाई यांनी स्पष्ट केले. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय पक्ष निरीक्षक नेमून अहवाल घेतले जाणार असून, पक्ष निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणनिहाय इच्छुकांची माहिती गोळा करण्यात आली असल्याचेही त्यांनी नमूद केले.








