तापमानाने घेतला पारा चढ; तहसीलदारांचा उन्हाळ्यात काळजी घेण्याचा इशारा

0
1
तापमानाने घेतला पारा चढ; तहसीलदारांचा उन्हाळ्यात काळजी घेण्याचा इशारा

फलटण (साहस टाइम्स) । फलटण शहरासह संपूर्ण तालुक्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक झाले आहे. उन्हाच्या झळा वाढू लागल्याने दुपारी घराबाहेर पडणे टाळावे, असे स्पष्ट आवाहन तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी केले आहे.

ज्यांना दुपारी बाहेर जाऊन काम करणे अपरिहार्य आहे, त्यांनी पांढऱ्या रंगाचे कापड, टोपी किंवा छत्रीचा वापर करून डोक्याचे आणि शरीराचे संरक्षण करावे, असे आवाहन त्यांनी केले. यामुळे उष्माघातासारख्या गंभीर त्रासांपासून बचाव होतो.

उन्हाळ्यात शरीरातून पाण्याचे बाष्पीकरण मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी वेळोवेळी भरपूर पाणी प्यावे. तसेच नारळपाणी, कोकम सरबत, कैरीचे पन्हे, ग्लूकोजसारखी नैसर्गिक व ऊर्जा देणारी पेये सेवन करावीत, अशी माहिती त्यांनी दिली. कृत्रिम थंड पेये, सॉफ्ट ड्रिंक्स यांचा वापर टाळावा, असा सल्ला ही त्यांनी दिला.

या दोन ते तीन महिन्यांच्या काळात गरज असल्यासच दुपारी घराबाहेर पडावे, अन्यथा शक्यतो विश्रांती घ्यावी, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.