
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आज पंचत्वात विलीन झाले. भारतीय अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि दुसरीकडे वंचितांसाठी शिक्षणाचा अधिकार, मनरेगा सारख्या योजनांसाठी ते कायम स्मरणात राहतील. ते आता प्रत्यक्ष उपस्थित नसले तरी त्यांच्या स्मृती जपण्यासाठी स्मारक व्हावे, अशी मागणी होत आहे. ज्या ठिकाणी त्यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे, तेथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात यावेत, अशी मागणी काँग्रेसने शुक्रवारी गृहमंत्र्यांना पत्र लिहून केली होती. त्यावर गृहमंत्रालयाने मनमोहन सिंग यांचे स्मारक त्यांच्या प्रतिष्ठेनुसार नक्कीच बांधले जाईल आणि त्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे उत्तर दिले. दरम्यान, मनमोहन सिंग यांचे स्मारक राजघाटाजवळील राष्ट्रीय स्मृती स्थळावर उभारण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मारकही येथे उभारण्यात आले आहे.