राज्याला देशातले पहिले बेघरमुक्त राज्य बनविण्यासाठी प्रयत्न करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

0
2
राज्याला देशातले पहिले बेघरमुक्त राज्य बनविण्यासाठी प्रयत्न करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

पुणे: ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधताना महाराष्ट्राला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य बनविण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामविकास विभागाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करताना, केंद्र शासनाकडून आणखी दहा लाख घरांना मंजुरी मिळणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. घर मंजूर झाल्यानंतर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

‘यशदा’ येथे झालेल्या या कार्यशाळेत ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, प्रधान सचिव एकनाथ डवले, यशदाचे महासंचालक निरंजन सुधांशू, तसेच मुख्यमंत्री सचिवालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “प्रशासन लोकाभिमुख आणि गतिमान करण्यासाठी मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणे आवश्यक आहे. विविध ठिकाणच्या चांगल्या कल्पनांचा अंगीकार करून कार्यक्षम यंत्रणा उभारावी.”

त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे ‘प्रधानमंत्री सूर्यघर’ योजनेच्या माध्यमातून सौरऊर्जेने वीजसंपन्न करण्याचा प्रस्ताव मांडला. यासाठी मनुष्यबळ आणि निधी विविध योजनांमधून उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. त्यामुळे रोजगार निर्मितीचेही नवीन मार्ग खुलतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

१०० दिवस कार्यक्रमात उत्तम कामगिरी करणाऱ्यांना सन्मान

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, राज्य शासनाच्या १०० दिवस कार्यक्रमात ग्रामविकास विभागाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या परीक्षणानंतर उत्तम काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची निवड करून त्यांचा सन्मान केला जाणार आहे.

“या कार्यक्रमातून राज्यातील १२,५०० कार्यालयांमध्ये कामकाजात पारदर्शकता वाढवून प्रशासनाबाबतचा विश्वास वाढविण्यात यश आले आहे,” असेही ते म्हणाले.

जलजीवन, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर विशेष भर

मुख्यमंत्री फडणवीस यांनी जलजीवन योजनेतील त्रुटी दूर करून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला. तसेच येत्या पाच वर्षात प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अंगणवाडीपासून शैक्षणिक सुधारणा राबवून सेवाभावी संस्थांच्या मदतीने प्रगती साधावी, असेही ते म्हणाले.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘लखपती दीदी’सारख्या योजना प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन

मुख्यमंत्री फडणवीस यांनी बचत गटातील महिलांना फिरती बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या उत्पादनाला चांगली बाजारपेठ मिळेल आणि महिलांच्या आर्थिक स्वावलंबनात मोठा बदल घडेल, असे सांगितले.

३० लाख घरे उभारण्याचे ग्रामविकास विभागाचे लक्ष्य – मंत्री जयकुमार गोरे

कार्यशाळेत बोलताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की, आतापर्यंत साडेतेरा लाख घरांना मान्यता देण्यात आली असून त्यापैकी ४६ हजार घरे पूर्ण झाली आहेत. ग्रामविकास विभाग ३० लाख घरे उभारण्याच्या दिशेने काम करत आहे आणि यासाठी जमीन उपलब्ध करण्यावर भर दिला जात आहे.

कार्यक्रमातील महत्त्वाचे उपक्रम आणि उद्घाटन

या कार्यशाळेत ग्रामविकास विभागाच्या विविध उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. त्यात सिंगल युनिफाईड पोर्टल, आवास वितरण ॲप, भूमिलाभ पोर्टल, महाआवास अभियान डॅशबोर्ड आणि नरेगा डॅशबोर्डचा समावेश आहे. तसेच २० जिल्हा परिषदांनी राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांवर आधारित पुस्तिका आणि ‘महाआवास त्रैमासिक’चे प्रकाशनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

मुख्यमंत्र्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सहा गटांमध्ये विभागून विविध विषयांवर उत्तम कल्पना आणि कार्यपद्धती विकसित करण्याचे निर्देश दिले.

कार्यक्रमाला राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.