महू (मध्यप्रदेश) – “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या शेवटच्या क्रांतीचा रथ आता कोणत्याही परिस्थितीत थांबवायचा नाही. तो पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपली आहे,” असे प्रभावी वक्तव्य भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव य. आंबेडकर यांनी केले.
महू येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मभूमीवर भारतीय बौद्ध महासभा इंदौर व मध्यप्रदेश शाखेद्वारे आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी ओबीसी समाजालाही या लढ्यात सामील करून घेण्याचे आवाहन केले.
“आज सरकारकडून आरक्षण, शिक्षण, नोकरी व संविधानिक हक्क हिरावण्याचे षड्यंत्र सुरू आहे. अशावेळी बाबासाहेबांच्या संस्थांची धुरा आपण वाहिली पाहिजे आणि शेवटच्या क्रांतीची मशाल पुन्हा पेटवली पाहिजे,” असे ते म्हणाले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अँड. एस. के. भंडारे यांनी महाबोधी महाविहाराच्या स्वामित्वासाठी चाललेल्या लढ्याचा पुनरुच्चार केला. “बुद्धगया येथील विहार संपूर्ण बौद्धांच्या ताब्यात द्यावा ही आमची मागणी असून, १२ मे (बुद्ध पौर्णिमा) पर्यंत सरकारने निर्णय न घेतल्यास आम्ही बिहार मंत्रालयावर मोर्चा नेऊ,” असा इशारा त्यांनी दिला.
कार्यक्रमात भंते सुमित रत्न (लखनऊ), राष्ट्रीय सचिव बी. एच. गायकवाड, अध्यक्ष चरणदास ढेंगरे, आर. सी. बौद्ध, मेजर उत्तम प्रधान, मेजर शांताराम वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन शुभम रायपूरे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंदौर जिल्हा शाखेचे संतोष सकपाल, कैलास इंगळे, राहुल इंगळे, नेहा इंगळे, विशाल इंगळे, सुजय बागडे, राजेश इंगळे, देवीदास गवई, रवि तायडे, गौतम वानखेडे, आनंद शेगोकार, सुनील प्रधान, निलेश वाघोदे, मिनाताई गवई, दिलीप वाकोडे आदींनी मेहनत घेतली.
दरम्यान, मध्यप्रदेश सरकारने अभिवादनासाठी आलेल्या जनतेसाठी आवश्यक सोयी न केल्यामुळे कार्यक्रमात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
जन्मभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भंते प्रज्ञाशील, समता सैनिक दलाचे सचिव डी. एम. आचार्य, मेजर जनरल व्हि. डी. हिवराळे, केंद्रीय शिक्षिका सुषमाताई कसबे, अविंदाताई वाघमारे, छायाताई गवई, वैशाली बोखरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.