फलटण :-फलटणमध्ये लोकशाहीचा उत्सव; प्रा. रमेश आढाव यांचे जनतेला मतदानाचे आव्हान – “लोकशाहीचा हा उत्सव म्हणजे भारतीय संविधानाचा उत्सव आहे,” असे प्रा. रमेश आढाव यांनी फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवाहन करताना सांगितले. संविधान समर्थन समिती पुरस्कृत प्रहार, स्वराज्य, व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संयुक्त पाठिंब्याने प्रा. रमेश आढाव हे निवडणुकीत रिंगणात उतरले आहेत. बच्चू कडू, माजी खासदार राजू शेट्टी आणि छत्रपती संभाजीराजे यांचे आभार मानत त्यांनी सांगितले की, त्यांना मिळालेला समाजाचा विश्वास आणि पाठिंबा हे त्यांच्यासाठी सर्वोच्च आहे.
प्रा. आढाव यांनी दलित चळवळीत त्यांचे योगदान सांगितले आणि दिवंगत केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांच्यासोबतच्या राजकीय अनुभवाचे स्मरण केले. शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्याचे काम पत्रकार म्हणून आपले कर्तव्य मानत त्यांनी केले असल्याचे त्यांनी सांगितले.
विविध समस्या आणि उद्दिष्टे
प्रा. आढाव यांनी निवडणुकीत निवडून आल्यानंतर त्यांच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. त्यांनी मागासवर्गीयांच्या आरक्षणातील बदल आणि सुप्रीम कोर्टाच्या १ ऑगस्ट २०२४ रोजीच्या निकालावर टीका केली. त्यांचे रक्षण करण्याची कटिबद्धता त्यांनी व्यक्त केली. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा असून, ओबीसी समाजाच्या आरक्षणात कोणताही बदल न करता स्वतंत्र आरक्षण द्यावे अशी त्यांची मागणी आहे.
शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, पिकासाठी पुरेसा वीजपुरवठा करावा, तसेच दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीतून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी त्यांनी केली. फलटणमध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र, सुसज्ज क्रीडा संकुल, अद्यावत रुग्णालय आणि स्थानिक उद्योगांना बिगर व्याज कर्जपुरवठा उपलब्ध करण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. तसेच ग्रामीण भागातील रस्ते, जलसंधारण आणि मृदा संवर्धनाद्वारे तालुक्याचा विकास साधण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
“जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई”
प्रा. आढाव यांनी सांगितले की, “आम्ही समाजाच्या अस्तित्वासाठी लढत आहोत. ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे.” त्यांनी मतदारांना २० तारखेला मतदान यंत्रावरील पाचव्या क्रमांकाच्या रोड रोलर चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले.
गेल्या १५ वर्षांत निवडून आलेल्या प्रतिनिधींनी केलेला विकास आणि त्यातून निर्माण झालेल्या प्रश्नांचा उल्लेख करीत, त्यांनी सांगितले की, “तालुक्याच्या विधायक विकासासाठी एकदा संधी द्या,” अशी त्यांनी सर्व मतदारांना विनंती केली आहे.