मुंबई / उत्तर प्रदेश राज्यात पुन्हा एकदा दलित समाजावरील अत्याचाराची अमानुष घटना समोर आली आहे. एका ११ वर्षीय दलित मुलीवर निर्घृण लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, या घटनेने संपूर्ण समाजाला हादरवून टाकले आहे. पीडित मुलीच्या शरीरावर दातांचे ठसे आढळले असून, गुप्तांगातून रक्तस्राव होत असल्याची गंभीर बाबही समोर आली आहे. या क्रूर घटनेमुळे तिची मानसिक स्थिती अत्यंत अस्थिर झाली आहे.
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जाब विचारला आहे. त्यांनी समाजमाध्यमांवरून आणि पत्रकारांशी संवाद साधताना आपला संताप व्यक्त केला.
“कळायला लागल्यापासून दररोज अशा बातम्या ऐकत आणि वाचत आहे. इतक्या वर्षांत काहीही बदलले नाही. फक्त सत्ताधारी बदलले आहेत. हे सत्ताधारी डेथ टुरिझम करतात आणि जनतेला मूर्ख बनवतात. जर तुम्हाला खरोखर बदल हवा असेल, तर तुमच्या मताचा वापर सुज्ञपणे करा,” असे अॅड. आंबेडकर म्हणाले.
तसेच त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना थेट विचारले, “तुमच्या प्रशासनात अजून किती दलित मुलींना अशा प्रकारचा छळ आणि लैंगिक हिंसाचार सहन करावा लागणार आहे?”
या घटनेने उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नागरिकांत तीव्र संताप असून, दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. बाललैंगिक अत्याचारासारख्या घटनांना आळा बसावा यासाठी कडक शासन आणि तत्काळ न्यायाची गरज आहे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि जनतेतून होत आहे.