उत्तर कोरेगावमधील दुष्काळ निवारणात आमदार निंबाळकर यांचे योगदान : आमदार दीपक चव्हाण यांचा विरोधकांवर घणाघात

0
2
उत्तर कोरेगावमधील दुष्काळ निवारणात आमदार निंबाळकर यांचे योगदान : आमदार दीपक चव्हाण यांचा विरोधकांवर घणाघात

फलटण :- उत्तर कोरेगाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी 2015-16 मध्ये वसना सिंचन योजनेला आवश्यक निधी मंजूर करून दिल्याचे श्रेय आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे असल्याचे आमदार दीपक चव्हाण यांनी पिंपोडे येथे घेतलेल्या जाहीर सभेत सांगितले. “वसना सिंचन योजनेअंतर्गत आलेले पाणी कुणा एकट्यामुळे आले नसून, नियमित फेरआढाव्यातून हे पाणी मिळाले आहे. तसेच श्रीमंत रामराजे यांनी प्रशासकीय पातळीवरही प्रयत्न केले आहेत. या योजनेसाठी कुणाचाही थेट निधी उपलब्ध झाला नाही. तरीही काही स्वयंघोषित नेते या कामाचे श्रेय घेत आहेत, अशा लोकांना आपण बाजूला ठेवले पाहिजे,” असे त्यांनी उपस्थितांना आवाहन केले.

सत्तेत राहून जनहितार्थ कार्य

यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

आमदार दीपक चव्हाण पुढे म्हणाले, “आपण सत्तेत राहून थांबलेली कामे मार्गी लावली आहेत. मात्र सत्तेत असूनही गुंडगिरी आणि दहशतीला सामोरे जावे लागले. फलटण तालुक्यातही ‘इडी’ सारख्या यंत्रणांचा सामना करावा लागला. या 30 वर्षांत रामराजे निंबाळकरांनी गावागावात हायमास्ट दिवे लावल्याशिवाय कोणताही विकास केला नाही, असा आरोप माजी खासदारांनी केला होता.”

उत्तर कोरेगावातील 15 वर्षांची सेवा

चव्हाण म्हणाले, “उत्तर कोरेगावातील प्रश्न सोडवण्यासाठी मी 15 वर्षे प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. वाठार स्टेशनमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत 8 कोटींची योजना, गावांमध्ये रस्ते, सांडपाणी, अंगणवाडी या मुलभूत सुविधांची पूर्तता केली आहे. तसेच वसना नदी पुनरुज्जीवन योजनेंतर्गत सोळशी ते देऊरपर्यंत 27 बंधारे उभारले, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे.”

विरोधकांना उपरोधिक सल्ला

आमदार चव्हाण यांनी विरोधी उमेदवार सचिन पाटील यांना उपरोधिक सल्ला देताना म्हटले की, “विरोधी उमेदवार नवीन आहेत. त्यांनी निवडणूक झाल्यानंतर आपल्या सातबाराचे परीक्षण करून स्वतःचा व्यवसाय उत्तमपणे करावा.”