अनिष्ट परंपरांना फाटा देत धम्मविचाराने कालकथित जायबाई धोंडीबा घोरपडे यांचा अस्थी संकलन व पुण्यानुमोदन विधी संपन्न

0
55
अनिष्ट परंपरांना फाटा देत धम्मविचाराने कालकथित जायबाई धोंडीबा घोरपडे यांचा अस्थी संकलन व पुण्यानुमोदन विधी संपन्न


फलटण :  समाजात खोलवर रुजलेल्या अंधश्रद्धा, कर्मकांड व अनिष्ट परंपरांना ठाम नकार देत बौद्ध धम्माच्या तर्कशुद्ध, मानवतावादी व वैज्ञानिक परंपरेनुसार कालकथित जायबाई धोंडीबा घोरपडे यांचा अस्थी संकलन व पुण्यानुमोदन विधी अत्यंत शांत, धम्ममय व विचारप्रवण वातावरणात पार पडला.
भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा (पूर्व) चे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संघटक, बौद्धाचार्य व केंद्रीय शिक्षक आयु. श्रीमंतराव धोंडीबा घोरपडे, वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा (पूर्व) चे माजी अध्यक्ष आयु. भीमराव धोंडीबा घोरपडे, तसेच भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष राजेंद्र धोंडीबा घोरपडे यांच्या मातोश्री कालकथित जायबाई धोंडीबा घोरपडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा विधी पूज्य भंते काश्यप यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
धम्मविचारांचे सखोल विश्लेषणात्मक मांडणी
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ विधी न करता धम्मविचारांचे विश्लेषण, चिंतन व आचरण यावर दिलेला भर.
मधुकर घोरपडे यांनी काल कालकथित जायबाई घोरपडे यांच्या आयुष्यातील आठवणी सांगताना त्यांच्या साधेपणा, संस्कारशीलता व कुटुंबातील मार्गदर्शक भूमिकेचा उल्लेख केला. त्यांच्या आठवणींमधून एका सामान्य गृहिणीचे असामान्य धम्मशील जीवन उलगडून आले. आयु. लक्ष्मण निकाळजे यांनी जुन्या कौटुंबिक आठवणी सांगत भीमशाहीर वामनदादा कर्डक यांचे गीत सादर केले. या गीतातून केवळ श्रद्धांजली नव्हे, तर आंबेडकरी चळवळीचा संघर्ष, आत्मसन्मान व सामाजिक जाणीवेचा वारसा अधोरेखित झाला.
भारतीय बौद्ध महासभेचे राज्यस्तरीय ऑडिटर अरुण गायकवाड यांनी कालकथित जायबाई घोरपडे यांच्या माहेरगाव वखारी येथील आठवणींना उजाळा देत, त्यांच्या जीवनातील सामाजिक जडणघडण स्पष्ट केली. त्यांच्या भाषणातून स्त्रीजीवन, कुटुंबसंस्कार व धम्ममूल्ये यांचा सुंदर संगम समोर आला.
माजी प्राचार्य शिवाजी सावंत यांनी आपल्या मार्गदर्शनातून कार्यक्रमाला तत्त्वज्ञानात्मक खोली दिली. त्यांनी धम्मपदातील निकायमधील भंते आनंद व तथागत बुद्ध यांच्यातील संवादाचा संदर्भ देत –
“शीलरक्षणाचे प्रयोजन काय?”
या प्रश्नाचे उत्तर बुद्धांनी निर्वाणाच्या दिशेने कसे नेले, हे प्रभावीपणे मांडले. याच धम्मविचारामुळे आपण स्वतः बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसारात कसे सहभागी झालो आणि या प्रवासात घोरपडे परिवाराचे योगदान किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी विशद केले.
चंद्रकांत मोहिते यांनी भगवान बुद्धांचा धम्म हा मनकेंद्रित असल्याचे सांगत धम्मपदातील गाथांचे विश्लेषण केले. “मन हेच सर्व गोष्टींचे उगमस्थान आहे” हा बुद्धविचार त्यांनी आजच्या सामाजिक वास्तवाशी जोडून स्पष्ट केला. यासोबतच आईच्या महिम्याचे गीत सादर करून वातावरण भावनिक केले. भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा (पूर्व) व शाखा फलटण तालुका यांच्या वतीने त्यांनी भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.

कालकथित जायबाई धोंडीबा घोरपडे या धम्मशील, शांत स्वभावाच्या व संस्कारक्षम व्यक्तिमत्त्व होत्या. धम्मकार्याला वाहून घेतलेल्या कुटुंबातील ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून त्यांनी आयुष्यभर सत्य, करुणा, मैत्री व समतेच्या मूल्यांची जोपासना केली. त्यांच्या संस्कारातूनच घोरपडे कुटुंबाने सामाजिक, शैक्षणिक व धम्मचळवळीत मोलाचे योगदान दिले आहे.
भंते काश्यप यांचे धम्ममार्गदर्शन
पूज्य भंते काश्यप यांनी तथागत बुद्ध व महामानवांना वंदन केल्यानंतर जीवनात होणाऱ्या अंतर्गत बदलांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
“आपल्या जीवनाचा शास्ता म्हणजे धम्म आहे. महापुरुषांना अभिवादन केल्यानंतर मिळणारा आनंद हा अद्वितीय असून तो जीवनाला दिशा देतो,” असे सांगत त्यांनी बुद्ध–धम्म–संघ या त्रिरत्नांप्रती समर्पित भावना ठेवून कर्मरूपाने पुण्यकर्म करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
आयोजन व उपस्थिती
हा अस्थी संकलन व पुण्यानुमोदन विधी
भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा (पूर्व) चे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे, भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते यांनी पार पाडला.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे केंद्र, राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी व उपासक -उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.