बारामती – हत्या करूनही सुटता येणार नाही, याचा ठोस संदेश बारामती न्यायालयाने दिला आहे. दौंड शहरातील पाच वर्षांपूर्वी घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणाचा निकाल देत बारामती येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. आर. पाटील यांनी एक ऐतिहासिक निर्णय सुनावला. संजीत टाकसह त्याच्या कुटुंबातील चार सख्खे भाऊ आणि तीन महिलांसह एकूण १२ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.
ही शिक्षा बारामती न्यायालयाच्या इतिहासातील सर्वाधिक आरोपींना एकाच प्रकरणात देण्यात आलेली शिक्षा आहे. ३ मे २०१८ रोजी विनोद नरवाल यांची त्यांच्या पत्नीसमवेत मोटारसायकलवरून जात असताना धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती.
संजीत, सुजीत, रवि, रणजित टाक, आकाश उर्फ छोटू बेहोत, नरेश वाल्मिकी, बबलू व सुरेश सरवान, मयुरी, माधुरी टाक, शोभा आणि विकी वाल्मिकी (सर्व रा. दौंड, पुणे) या बारा आरोपींनी तलवार, कोयते, लोखंडी पाइप, दगडांचा वापर करून नरवाल यांच्यावर क्रूर हल्ला केला होता.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन जाधव यांनी केला. विशेष सरकारी वकील प्रसन्न जोशी, सहायक सरकारी वकील डी. एस. शिंगाडे, फिर्यादीचे वकील अॅड. मंगेश देशमुख, कोर्ट पॅरवी अधिकारी नामदेव नलवडे व जी. के. कस्पटे, आणि पोलिस अधिकारी मनिषा अहिवळे यांच्या मेहनतीने हे प्रकरण न्यायालयात सिद्ध झाले.
न्यायालयाने प्रत्यक्षदर्शी, न्यायवैद्यकीय साक्षी आणि आठ साक्षीदारांच्या साक्षीवर विश्वास ठेवत जन्मठेपेचा निर्णय दिला. दंडाची रक्कम नरवाल यांच्या पत्नी मीना यांना देण्याचे निर्देशही दिले.