साहस Times :- संघर्षभूमी येथे सुरू असलेल्या १४ दिवसीय भीमजयंती महोत्सवात सम्राट अशोक जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गेली १० वर्षे सातत्याने होणाऱ्या या कार्यक्रमात यंदाही प्रबोधनपर व्याख्यानासह प्रतिमा पूजन, सामूहिक वंदना आणि सांस्कृतिक सहभागाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात तथागत बुद्धांच्या पुतळ्याला पुष्प अर्पणाने झाली. त्यानंतर सम्राट अशोक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. सामूहिक वंदनेनंतर, प्रमुख वक्ते पंकज भटकर यांनी ‘नैतिकतेचे आणि मानवतेचे आश्रयदाते सम्राट अशोक’ या विषयावर सखोल व्याख्यान दिले.
आपल्या भाषणात भटकर यांनी सम्राट अशोकांचा इतिहास, कलिंग युद्धानंतरचे मनपरिवर्तन, प्रमुख शिलालेख व त्यामधील नैतिक संदेश, लेण्यांचे महत्व, तसेच धम्म प्रचार आणि प्रसार याची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “सम्राट अशोकांनी नैतिकतेला आणि मानवतेला खऱ्या अर्थाने राजाश्रय दिला.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात डॉ. किर्तीराज लोणारे यांनी सम्राट अशोकांच्या शिलालेखांमधील तत्वज्ञान आणि संदेश यावर प्रकाश टाकला. सूत्रसंचालन सुभाष घाडगे यांनी तर आभार प्रदर्शन संजय हतागळे यांनी केले. ‘सरणतंय गाथेने’ कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
या वेळी ॲड. शाम तांगडे, विश्वनाथ सावंत, चंद्रमणी गोवंदे, नरसिंग तरकसे, वसंत वाघमारे, शंकर भटकर, शामसुंदर परतवाघ, रुपेश जोगदंड, प्रमोद सिताप, भारत सातपुते, द्रुपदाआई सरवदे, ज्योतीताई हतागळे, सुमित्राताई पोटभरे, डॉ. सुरेखाताई चव्हाण, रमाताई सिताप, मिनाताई परतवाघ, आरतीताई भटकर, शोभाताई घोडके, शारदाताई बनसोडे, सरस्वतीताई लांडगे यांची उपस्थिती लाभली.