आषाढी वारीच्या तयारीचा आढावा : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा स्पष्ट आदेश — दोन दिवसांत रस्ते आणि पालखीतळ दुरुस्तीचे प्रस्ताव सादर करा!

0
1
आषाढी वारीच्या तयारीचा आढावा : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा स्पष्ट आदेश — दोन दिवसांत रस्ते आणि पालखीतळ दुरुस्तीचे प्रस्ताव सादर करा!

पुणे | आषाढी वारीत लाखो वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी आषाढी वारी पूर्वतयारीचा आढावा घेत स्पष्ट आदेश दिला की, पालखी मार्गावरील रस्ते आणि पालखीतळ दुरुस्तीचे प्रस्ताव दोन दिवसांत सादर करा.

पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत मंत्री गोरे बोलत होते. या वेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि सातारा, सोलापूर, नाशिक व जळगाव येथील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

जयकुमार गोरे यांनी केलेले महत्त्वाचे निर्देश –

  • प्रत्येक मुक्काम, विसावा स्थळ व पालखी मार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी फिरती शौचालये, स्वच्छता कर्मचारी नेमावेत.
  • टँकरमधून पुरवण्यात येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता नियमित तपासावी.
  • रेस्टॉरंट्स, हॉटेल्स यांची स्वच्छता व अन्नपदार्थांची गुणवत्ता तपासावी.
  • पंढरपूरमध्ये कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी मनुष्यबळ व वाहनांची पूरक व्यवस्था करावी.
  • पोलीस व जिल्हा प्रशासनाने ड्रोनद्वारे नियंत्रण ठेवण्यासाठी संयुक्त व्यवस्थापन उभे करावे.
  • कंत्राटदारांकडून कामांच्या अटी-शर्तींचे पालन होईल यासाठी शासकीय यंत्रणांनी लक्ष ठेवावे.

ग्रामपंचायतींना आगाऊ निधी देण्यात येईल अशी ग्वाही देत, वारीदरम्यान आरोग्य, पिण्याचे पाणी व स्वच्छतेसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही मंत्री गोरे यांनी सांगितले.

स्वच्छ व सुरक्षित वारीसाठी समन्वयाचे आवाहन :
विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी वारीतील सुविधा आणि नियोजन यावर माहिती दिली. त्यांनी टँकर वेळेत पोहोचतील याची खबरदारी घेण्याचे आणि स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवण्याचे निर्देश दिले.

वारकऱ्यांचा आषाढी सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी शासनाकडून युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. आता खरी कसोटी आहे ती नियोजन वेळेत प्रत्यक्षात उतरण्याची.