बारामतीत सर्वधर्मीय विराट जनआक्रोश मोर्चा : संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपींना फाशीची मागणी

0
3
बारामतीत सर्वधर्मीय विराट जनआक्रोश मोर्चा : संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपींना फाशीची मागणी

बारामती : मस्साजोग येथील सरपंच कै. संतोष पंडितराव देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आणि आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी बारामतीत मराठा क्रांती मोर्चाच्या नेतृत्वाखाली विराट जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने सर्वधर्मीय नागरिकांनी सहभाग घेतला.

मोर्चाची भव्य निघणूक

सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी उद्यान, कसबा येथून मोर्चाची सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून गुणवडी चौक, मारवाड पेठ, सुभाष चौक मार्गे मोर्चा भीगवण चौकात पोहोचला. यावेळी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसह हजारो नागरिक सहभागी झाले होते.

देशमुख कुटुंबियांचे अश्रुपूर्ण मनोगत

मोर्चादरम्यान स्व. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि कन्या वैभवी देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त करताना हत्येतील आरोपींना फाशीची मागणी केली. बारामती शहरात दुपारपर्यंत कडकडीत बंद पाळण्यात आला.

प्रशासनाला निवेदन सादर

मराठा क्रांती मोर्चा आणि सर्वधर्मीय बारामतीकरांच्या वतीने प्रांताधिकारी वैभव नावडकर यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यात पुढील महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या :

  1. हत्या प्रकरणाचा जलदगती न्यायालयात खटला चालवावा.
  2. फरार आरोपींना तातडीने अटक करावी.
  3. आरोपींना जेलमध्ये विशेष सवलती देणे बंद करावे.
  4. खटला बीड जिल्ह्याऐवजी इतर जिल्ह्यात किंवा मुंबईत चालवावा, जेणेकरून आरोपी साक्षीदारांवर दबाव टाकू शकणार नाहीत.
  5. धनंजय मुंडे यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करावी, तसेच त्यांचा संबंध आढळल्यास त्यांना सहआरोपी करावे.
  6. वाल्मिक कराड याच्या आर्थिक व्यवहारांची ईडीमार्फत चौकशी करावी आणि त्याला फाशीची शिक्षा द्यावी.
  7. देशमुख कुटुंबियांसह मस्साजोग गावाला पोलिस संरक्षण द्यावे.

मोर्चात संतापाचा सूर

मोर्चादरम्यान “देशमुख कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे”, “कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना सहआरोपी करा”, “यमसदनाच्या यातना देणाऱ्या नराधमांना यमसदनीच पाठवा”, “नाही चालणार दादागिरी – नाही चालणार गुंडगिरी!” अशा घोषणा देत रोष व्यक्त करण्यात आला.

राजकीय व सामाजिक हलचल

या हत्याकांडाने संपूर्ण समाजमन हादरले असून, आरोपींना तातडीने कठोर शिक्षा व्हावी, अशी जनतेची मागणी आहे. प्रशासनाने योग्य ती कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.