सातारा :- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाल्याने पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे. या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष वेधून घेतलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पुतण्या युग्रेंद्र पवार यांचा 1 लाख मताधिक्क्याने पराभव केला.
यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली. सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, “बारामतीत कोणीतरी उभं राहायला हवं होतं. कोणीही उभं राहिलं नसतं तर महाराष्ट्राला काय संदेश गेला असता?”
ते पुढे म्हणाले, “अजित पवार आणि युग्रेंद्र पवार यांची तुलना होऊ शकत नाही. अजित पवार यांचं संघटन कौशल्य, सत्तेतील स्थान आणि अनुभव यामुळं त्यांचा विजय अपेक्षित होता. दुसरीकडे, युग्रेंद्र पवार हे नवख्या उमेदवार होते. निकालावर आम्हाला आश्चर्य नाही.”
लोकांनी दिलेला निर्णय मान्य – शरद पवार
राज्यात महायुतीच्या विजयावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, “राज्यातील जनतेचा निर्णय आम्हाला मान्य आहे. निकालाचा सखोल अभ्यास करून आम्ही पुन्हा लोकांपुढे जाण्याची तयारी करू.”
यावेळी पवारांनी प्रचारातील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या “बटेंगे तो कटेंगे” या वक्तव्याचा, तसेच “लाडकी बहीण” योजनेचा प्रभाव मतदारांवर पडल्याचं मान्य केलं. “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला मोठ्या प्रमाणात मतं मिळाली,” असं ते म्हणाले.
निकालानंतरही सामाजिक बांधिलकी टिकवणार – शरद पवार
निकालावर बोलताना शरद पवार म्हणाले, “महायुतीच्या विजयामुळे काहीही झालं तरी आम्ही महाराष्ट्राचा सामाजिक नावलौकीक आणि बांधिलकी बिघडू देणार नाही.”
अशा प्रकारे, निवडणुकीनंतरच्या पहिल्या प्रतिक्रियेत शरद पवारांनी विरोधी पक्ष म्हणून पुढील योजना स्पष्ट केल्या.