कडक आहे, पण योग्य कारणासाठीच!” अजित पवार

0
1
कडक आहे, पण योग्य कारणासाठीच!” अजित पवार

सातारा | प्रतिनिधी :-  “जर मी कडक असतो, वेडा असतो, तर बारामतीकरांनी मला आठ वेळा निवडून दिलं असतं का?” असा रोखठोक सवाल करत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी साताऱ्यातील सभेत विरोधकांना चपखल उत्तर दिलं. कडकपणा ही कमजोरी नाही, ती शिस्तीची आणि जबाबदारीची निशाणी आहे, असं स्पष्ट करत त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली.

साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी पुन्हा एकदा त्यांच्या मिश्किल शैलीत विरोधकांना सुनावलं. ते म्हणाले, “हो, मी कडक आहे. पण कोणासाठी? जे चुकीचं वागतात त्यांच्या साठीच. जे योग्य वागतात, त्यांना मी कायम साथ दिली आहे आणि देईन.”

ते पुढे म्हणाले, “सकाळी लवकर उठून काम करणारी माणसं आम्ही आहोत. आमच्यात आळस नाही. आज राज्याचा साडेसात लाख कोटींचा अर्थसंकल्प आहे, त्यातील निम्मे उत्पन्न पगार, पेन्शन आणि कर्जाच्या व्याजात जातं. उरलेल्या निधीतून आम्ही राज्याचा सर्वांगीण विकास साधत आहोत. याच अनुभवाच्या बळावर मी अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे.”

“या बोटाचा थुका त्याला, त्याचा याला… असं नको!”
लोकांनी दिशाभूल करू नये, लोकांना फसवू नये, अशा शब्दांत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना आणि स्थानिक नेत्यांना स्पष्ट संदेश दिला. “जे शक्य आहे तेच सांगा. जे शक्य नाही, त्याबद्दल लोकांना विश्वासात घ्या,” असं सांगताना त्यांनी पारदर्शक कारभारावर भर दिला.