मुंबई : राज्यातील घवघवीत यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधीमंडळ नेतेपदी निवड केली आहे. आज देवगिरी बंगल्यावर पार पडलेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी एकमताने ही निवड केली. महायुतीच्या तुफानी यशानंतर सरकार स्थापनेसाठी हालचालींना वेग आला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसला किती मंत्रीपदे मिळतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बारामतीत अजित पवारांनी तब्बल १ लाख मताधिक्याने विजय मिळवला असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने राज्यभरात ४१ जागा जिंकल्या आहेत. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने सरकार स्थापनेसाठी चर्चा सुरू झाल्या आहेत.
नवनिर्वाचित आमदारांचे मार्गदर्शन व सत्कार
राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अजित पवार यांनी नवनिर्वाचित आमदारांना आगामी पाच वर्षांत मतदारसंघातील विकासकामांवर भर देण्याचे निर्देश दिले. यावेळी आमदारांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
मुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार?
महायुतीकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून, मुख्यमंत्रीपद कोणाला मिळेल याकडे उत्सुकता वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्रीपदासाठी अंतिम निर्णय होईल. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.