फलटण |श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यानंतर फलटण शहरात नगरपालिकेने केलेल्या कामकाजाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. वारकऱ्यांच्या प्रस्थानानंतर अवघ्या काही तासांत पालखी तळाची संपूर्ण स्वच्छता करून फलटण नगरपरिषदेने प्रशासनाची कार्यक्षमता सिद्ध केली. मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या या मोहिमेमुळे कचरा, दुर्गंधी यांसारख्या त्रासांना यशस्वी आळा घालण्यात आला.
पालखीच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर तयारी केली होती. शहरात विविध 13 वॉटर पॉईंट्सवरून सुमारे 1000 वारकऱ्यांना अंदाजे 10,000 लिटर शुद्ध पाणी पुरवले गेले. वैद्यकीय मदतीसाठी पंचायत समिती, आरोग्य विभाग व उपजिल्हा रुग्णालय यांच्याकडून उत्कृष्ट सेवा देण्यात आली. 1992 जर्मन टेन्टवर 1240 आणि सावता माळी मंदिर येथे 1645 वारकऱ्यांनी वैद्यकीय सुविधा घेतल्या.
याशिवाय, यशवंतराव चव्हाण हायस्कूलमधील जर्मन हँगरमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून 150 फिजिओथेरपी विद्यार्थ्यांनी मसाज सेवा दिली, ज्याचा 4000 हून अधिक वारकऱ्यांनी लाभ घेतला.
स्वच्छतेसाठी नगरपरिषदेच्या 70 कर्मचाऱ्यांबरोबरच खाजगी तत्वावरील 25, कराड, मलकापूर, महाबळेश्वर येथील 100, कोल्हापूर जिल्हा आणि कागल येथील 25 कर्मचारी, तसेच सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या 150 विद्यार्थ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून कचरा संकलन मोठ्या प्रमाणात पार पडले. पाच ट्रॅक्टर ट्रॉली, दोन जेसीबी आणि १६ घंटा गाड्यांच्या सहाय्याने सुमारे ८ टन कचरा संकलित करण्यात आला.
फलटण नगरपालिकेच्या नियोजनबद्ध व कार्यक्षम व्यवस्थेमुळे या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्याचे यश अधिक सशक्त झाले आहे. अशा प्रकारच्या नियोजनाची पुढील काळातही पुनरावृत्ती व्हावी, हीच सर्वांची अपेक्षा आहे.