
अभिनेता पुष्कर जोग याने बीएमसी कर्मचाऱ्यांवर टीका करताना ‘त्यांना लाथा घातल्या असत्या’ असे शब्द वापरले होते. यावरच आता अभिजीत केळकर याने सोशल मीडियावरून एक पत्र लिहित पुष्कर जोग याला घरचा आहेर दिला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पोस्टमध्ये अभिजीत केळकर याने लिहिले की, ‘प्रिय मित्र पुष्कर जोग यांस, मित्रा,तुझी चर्चेत असलेली, वादग्रस्त पोस्ट वाचली. ती सोशल मीडियावर होती, त्यामुळे इथेच तुला पत्र लिहिण्याचा हा प्रपंच… मी महानगरपालिका कर्मचाऱ्याचा मुलगा आहे, ज्याचा मला सार्थ अभिमान आहे. माझी आई महानगरपालिकेत शिक्षिका होती. तिच्याबरोबर,तिला आणि तीच्या मैत्रिणींना मदत म्हणून मी अनेकदा जनगणना, सर्वेक्षण, प्रौढ शिक्षण या कामात अनेक वर्ष तिच्याबरोबर गेलो आहे, मदत केली आहे. उन्हातान्हात, पावसातसुद्धा फिरून ही कामं करावी लागतात. वरून आदेश आला की, त्याची अंमलबावणी करणं एवढंच त्यांचं काम असतं. दिलेल्या फॉर्मवर असलेले प्रश्न विचारावे लागतात,ते काही त्यांच्या मनातले नसतात.’








