“नृत्यसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकरः तमाशा कलावंत ते राष्ट्रपती पदक विजेत्या प्रवासाची कहाणी”

0
1
“नृत्यसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकरः तमाशा कलावंत ते राष्ट्रपती पदक विजेत्या प्रवासाची कहाणी”

.”राष्ट्रपती पदक विजेत्या तमाशाकलावंत”
नृत्यसम्राज्ञी विठाबाई भाऊ नारायणगावकर
जुन्नरची एक ओळख
सन १९४६ साली कराड तालूक्यातील ‘कोळेगांव’ मुक्कामी त्यावेळचे नावाजलेले दोन तमाशा फड समोरासमोर ‘सामन्या’साठी ऊभे ठाकले होते..! एक होता ‘भाऊ अकलेकर’ तर दुसरा होता ‘भाऊ नारायणगांवकर.’ यांच्या सवालजवाबातील जुगलबंदी पाहण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय जमला होता. केवळ तमाशात स्त्री नर्तिका नाही म्हणून कै. भाऊ नारायणगावकरांना हार पत्करावी लागली! ऊभ्या महाराष्ट्रात भाऊंनी आत्तापर्यंत कधी ‘हार’ पाहिलीच नव्हती.

हा अपमान भाऊंच्या जिव्हारी लागला होता. त्यावेळी विठा कै. मामा वरेरकरांच्या कलापथकात मुंबईमध्ये काम करीत होती. स्वत: भाऊंनीच तिची अभिनयातील निपुणता वाढवण्यासाठी मामा वरेरकरांच्या विनंतीला मान देऊन तिला तेथे ठेवले होते. त्याच रात्री भाऊंनी मुंबई गाठली व झाला प्रकार विठाला सांगितला. विठाच ती…वाघिनीसारखी चवताळून ऊठली व जन्मदात्या बापाचा अपमानाचा बदला घेण्यासाठी, आपल्या वडीलांबरोबर दुसऱ्याच दिवशी कोळेगांवला आली. त्याच रात्री तिथेच पुन्हा सामना सुरू झाला. ‘भाऊ अकलेकर व भाऊ नारायणगांवकर’ या मातब्बरांचा सामना पाहण्यासाठी अवघा कराड तालूका लोटला होता.


अनेक सवाल-जवाब झाले, पण कोणीही माघार घेत नव्हते. रात्र सरत चालली होती आणि पहाटेच्या ऊगवत्या शुक्रचांदणी बरोबरच विठा पहिल्यांदाच वयाच्या अवघ्या आकराव्या वर्षी बापासाठी पायऱ्यांना नमस्कार करून बोर्डावर हजर झाली. समोर बसलेल्या हजारोंच्या जनसमुदायास मुजरा करून विठाने पहिलाच सवाल आकलेकरांच्या शेवंतास विचारला…

“पुरूष समागम थेंबापोटी
नार होतसे गरवार…
परी नराश्रूंच्या थेंबापोटी
नार कोण ती गरवार..??”
आणि विठाच्या पहील्याच सवालाने शेवंताची दातखीळच बसली. तिच्याकडेच काय? पण तिच्या बापाकडे अकलेकरांकडेदेखील या सवालाचे उत्तर नव्हते. नियमाप्रमाणे शेवटी विठानेच उत्तर दिले…
“रम्य वनी हो रासक्रीडेत
नारायण ते रमले गं..
प्रणयाचे ते कर्म देवाचे
चोरून मोराने पाहीले गं..
मोराच्या या दुष्कृत्याने
देव तयावर कोपले गं…
प्रणयाचे हे भाग्य तुजला
नाही मिळणार वदले गं…
मोराला शाप देताच वंश विस्तारासाठी मोर गयावया करू लागला. तेव्हा देवाला दया येऊन मोराच्या प्रणयविरहीत वंशविस्तारासाठी त्याने मोराला उ:शाप दिला…
“गरजतील मेघ जेव्हा नभाला…
करशील आकांत बघून मेघाला…
अश्रू नेत्रांची गळतील भुईला.
गिळताच ती भार्या तुझी
देईन जन्म पिलाला गं…”
आणि हजारो जनसमुदायासमोर फक्त विठाच जिंकली होती. तेही जन्मदात्या बापाच्या अपमानाचा बदला घेऊनच! तेही पहिल्याच सलामीला.

सुमारे अर्धशतक विठाबाईंनी महाराष्ट्र हलवला, झुलवला, खुलवला व फुलवला देखील. नाटक, सिनेमा यामधून देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.

मुंबईत चेंबूरच्या आर. के. स्टुडीओमध्ये ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाचे शुटींग चालू असताना, विठाबाईंच्या गाड्या तिथून जात होत्या…तर शुटींग पाहायला आलेले लोक राज कपूर, मंदाकीनीला सोडून विठाबाईंच्या फक्त गाड्या पाहण्यासाठी त्यांच्याभोवती गराडा घालून बसले होते. स्टुडिओच्या दारातून राज कपूरला ते दृष्य दिसले, तर त्याने शुटींग थांबवून, विठाबाईंना बोलावून घेतले… स्वत:च्या शेजारी विठाबाईंना बसवून घेऊन
या चित्रसम्राटाने तीला स्वत: सन्मानाने वागवले. कारण त्यांना विठाबाई माहित होती. ज्या काळात हिंदी चित्रपटसृष्टी राज कपूरच्या ईशाऱ्यावर नाचत होती, मधूबालापासून तर झीनत अमानपर्यंत त्यांच्या चित्रपटामध्ये काम मिळावे म्हणून आघाडीच्या अभिनेत्री राज कपुरपुढे लोटांगण घालत होत्या. त्याच राज कपूर यांनी स्वत:च्या चित्रपटात काम करण्याची विनंती विठाबाईला केली पण…
“मै जहाँ हूँ, जिस दुनियामे हूँ, खूष हूँ. आपकी दुनिया मुझे कभी रास नही आ सकती” असे बाणेदार पण नम्रपणे उत्तर देऊन, विठाबाईंनी स्वत:चे ‘विठापण’ जपले. ज्या जन्मदात्या बापासाठी तिने वयाच्या आकराव्या वर्षी तमाशाच्या बोर्डावर पाऊल ठेवले होते, त्याच बापाचे नांव पुढे चालवण्यासाठी तमाशा कलेसारख्या जीवंत कलेचीच सेवा करायची शपथ तिने घेतली होती व ऊभी हयातभर ती निभावलीदेखील.

सन 1962 साली चिनने भारतावर आक्रमण केले होते. संरक्षणमंत्री म्हणून यशवंतरावजी चव्हाण यांच्या खांद्यावर नुकतीच नेहरूंनी जबाबदारी दिली होती. भारताची तयारी नसताना अचानक झालेल्या आक्रमणामुळे आपली पिछेहाट होत होती. त्यामुळे सैनिकांचे मनोधैर्य टिकवणे, ही मोठीच जबाबदारी स्व. चव्हाणसाहेबांवर होती. सीमेवर बहूतेक ठिकाणी मराठा बटालीयन झूंज देत होती. त्यांचे मनोधैर्य टिकवण्याकरीता सैनिकांचे काहीतरी वेगळे मनोरंजन करणे आवश्यक होते.
मा.यशवंतरावांनी विठाबाईंनाच युद्ध चालू असताना सीमेवर सैनिकांसमोर कार्यक्रम करण्याची विनंती केली. देशसेवेच्या चालून आलेल्या सुवर्णसंधीला विठाबाईंनी तत्काळ हेकार दिला. डोळ्यांसमोर बाँम्ब फुटत असताना, स्वत:च्या मृत्यूचीही तमा न बाळगता विठाबाईंनी भारत-चीन सीमेवर नेफा आघाडीवर तब्बल दोन आठवडे मराठी तसेच हिंदी भाषेत कार्यक्रम करून, जे देशाची सेवा करतात, त्यांची सेवा करून फार मोठे राष्ट्रकार्य केले आहे. एवढ्या मोठ्या कार्याची व लोकरंजनातून लोकशिक्षणाची फार मोठी जबाबदारी, उभी हयातभर विठाबाईंनी पार पाडली. याची दखल प्रत्यक्ष भारत सरकारला घ्यावीच लागली. तत्कालीन राष्ट्रपती श्री.आर वेंकटरमन यांच्या हस्ते विठाबाईंना ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ स्विकारण्यासाठी ‘राष्ट्रपती भवन’ दिल्ली या ठिकाणी बोलावून घेण्यात आले..

१८ एप्रिल १९९० रोजी महाराष्ट्राच्या तमाशा क्षेत्रातील महान कलावंत ‘विठाबाई’ यांना पुरस्कार देण्याचे नक्की झाले. दिल्लीतील फिरोजशहा रोडवर असलेल्या,”राष्ट्रपती भवन” येथे पुरस्कार देण्यासाठी भारताचे राष्ट्रपती मा. आर. वेंकटरमन, आपल्या सुविद्य पत्नी सौ.जानकीदेवी यांच्यासोबत आले. महाराष्ट्राच्या तमाशा कलाक्षेत्रात ‘विशेष प्राविण्य’ मिळवणाऱ्या, लोकरंजनातून लोकप्रबोधन व लोकशिक्षण देणाऱ्या विठाबाई भाऊ नारायणगांवकर या लोकनाट्य तमाशाच्या मालकीण विठाबाई भाऊ खुडे असे नांव पुकारल्याबरोबर विठाबाईंच्या डोळ्यात टचकन पाणीच आले. असंख्य जुन्या स्मृती जाग्या झाल्या. बरोबर तीस वर्षांपुर्वी १९६१ साली तत्कालीन राष्ट्रपती मा.डाँ.राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते हाच पुरस्कार चुलतबंधू कै. बापु खुडे नारायणगांवकर यांनी स्विकारण्या आगोदर विठाबाईंना तो स्विकारण्याची विनंती केली होती. पण विठाबाईंनी,’मी दुसरा मिळविनच’ असे बापूंना वचन दिले होते व त्या वचनाची पुर्तता आज झाली होती.

गालावर ओघळणारे आनंदाश्रू पुसून विठाबाई पुरस्कार स्विकारण्यासाठी व्यासपीठावर राष्ट्रपती श्री.आर. वेंकटरमण यांच्यासमोर कँमेऱ्यांच्या लखलखाटात उभ्या राहिल्या. एका सुशोभित ताटात एका युवतीने विठाबाईंसाठी आणलेला पुरस्कार तिला देण्यासाठी राष्ट्रपतींनी हातात घेतला, तोच विठाबाईंनी हात दाखवून राष्ट्रपतींना थांबवले…सारे प्रेक्षागृह स्तब्ध झाले. त्याचवेळी विठाबाई भारताच्या महामहीम राष्ट्रपतीना म्हणाल्या…’थांबा साहेब, आपण या पदावर जे आहात, त्यामागे तुमच्या पत्नी बाईसाहेबांचेही मोठे योगदान आहे. त्यांनाही व्यासपीठावर बोलवून तुमच्या बरोबरीने उभे करून मला पुरस्कार देण्यात यावा.’ आत्तापर्यंत पुरस्कार वितरणासाठी राष्ट्रपतींबरोबर कधीही त्यांच्या पत्नी व्यासपीठावर येत नसत. नव्हे, तसा ‘प्रोटोकाँल’ नसायचाच. पण विठाबाईंनी प्रत्यक्ष भारताच्या राष्ट्रपतींना देखील हात दाखवून दोन मिनिटे थांबायला लावले. ‘स्त्रीशक्ती’चे महत्व स्वत:च्या कृतीतून संपुर्ण राष्ट्रास दाखवून दिले. सौ.जानकीदेवी राष्ट्रपतींच्या शेजारी येऊन उभ्या राहीपर्यंत प्रत्यक्ष राष्ट्रपतींनाही दोन मिनिटे ताटकळत ठेवण्याची धाडस एका महान तमाशा कलावंतीनीमध्ये अखंड हिन्दुस्थानने पाहिले.

दुसऱ्या दिवशी संपुर्ण देशातील आघाडीच्या वृत्तपत्रात पहिल्याच पानावर ही बातमी उभ्या हिन्दूस्थानमध्ये ‘महाराष्ट्राची मुलाखत मैदानी तोफ विठाबाई नारायणगावकर’ हे नाव व फोटोसकट झळकली.

विठाबाईंच्या स्मृतींस शतश: नमन !!!🙏🏼🙏🏼