
फलटण प्रतिनिधी :- राजुरी (ता. फलटण) येथील भैरवनाथ मंदिर परिसरात गावातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी महिला सक्षमीकरण मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती देत प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यात सामाजिक कार्यकर्त्या वैशाली कांबळे यांनी महिला सक्षमीकरण व सबलीकरण या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी शासकीय योजनांचा योग्य वापर कसा करावा, आवश्यक कागदपत्रे कोणती आणि अर्ज प्रक्रिया कशी असते, याची माहिती त्यांनी दिली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबांसाठी उपलब्ध असलेल्या विविध योजनांची ओळख करून देत पात्र लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रे गोळा करण्यात आली.
शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत निराधार महिलांचे अर्ज भरून घेण्यात आले असून, पात्र महिलांना निश्चितपणे लाभ मिळवून देणार असल्याचे वैशाली कांबळे यांनी सांगितले. यामुळे अनेक महिलांना दिलासा मिळाला.
फलटण बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष शांताराम कारंडे यांनी कामगार नोंदणीचे महत्त्व तसेच नोंदणीमुळे मिळणारे विविध लाभ याबाबत सविस्तर माहिती दिली. कामगारांनी वेळेत नोंदणी करून शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे केंद्रप्रमुख संदीप कांबळे उपस्थित होते. तसेच राजुरीचे सरपंच मनोहर पवार, उपसरपंच अनिता साळुंखे, फलटण तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष धनंजय पवार, श्रीराम कारखान्याचे संचालक मारुती सांगळे, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंभूराज पाटील, भैरवनाथ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब सांगळे, माजी सरपंच जयकुमार इंगळे यांच्यासह भारत गावडे, विठ्ठल खुरुंगे, माऊली जाधव, मफतलाल पवार, सोमनाथ गावडे, पोपट हगारे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रमेश बागाव, पिंटू रणदिवे, अमोल बागाव, बापू बागाव यांनी विशेष परिश्रम घेतले. मेळाव्यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढून शासनाच्या योजनांविषयी जागरूकता निर्माण झाल्याची भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली.








