
What is Santhara Vrat: पृथ्वीवर ज्याचा जन्म झाला आहे, त्याचा मृत्यू अटळ आहे. जन्मानंर मृत्यू कोणालाही चुकलेला नाही. पण ज्याप्रमाणे जन्म घेणं आपल्या हातात नसतं, तसंच मृत्यूचंही आहे. पण अनेकदा काही प्रकरणांमध्ये एखाद्याची जगण्याची इच्छा संपते. पण भारतात इच्छामरण बेकायदेशीर असल्याने त्याला जीवन संपवण्याची परवनागी दिली जात नाही. पण जैन धर्मात संथारा अशी एक प्रथा आहे, ज्यामध्ये एखादी व्यक्ती स्वच्छेने मृत्यू जवळ येईपर्यंत उपवास करते. जैन धर्मतील 3 वर्षांची वियानाच्या मृत्यूमुळे ही प्रथा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यानिमित्ताने ही प्रथा नेमकी काय आहे? हे कायदेशीर आहे का? असे अनेक प्रश्न विचारले आहेत. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात.
नेमकी घटना काय?
जैन दांपत्य पियूष जैन आणि वर्षा जैन यांनी ब्रेन ट्युमर झालेल्या आपल्या 3 वर्षांच्या मुलीला संथारा प्रथेचं पालन करायला लावलं. ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. जैन साधू राजेश मुनी महाराज यांनी दिलेल्या आदेशानुसार ही प्रथा पाळण्यात आली. मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये ही घटना घडली आहे. 21 मार्च रोजी वियानाने अखेरचा श्वास घेतला. ही प्रथा पाळणारी वियाना सर्वात तरुण व्यक्ती असल्याने गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने तिची नोंद घेतली असून, प्रमाणपत्र जारी केलं आहे.
काय आहे संथारा प्रथा?
जैन धर्मानुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीला किंवा जैन भिक्षूला आपला मृत्यू जवळ आला आहे असं वाटतं तेव्हा तो स्वतःला एका खोलीत बंद करतात. यानंतर ते अन्न आणि पाणी सोडून देतो. जैन धार्मिक ग्रंथांमध्ये संथारा प्रथेचं वर्णन संलेखाना, समाधीमारण, संन्यासमरण असं म्हणूनही करण्यात आलं आहे.
पण संथारा प्रथेचं पालन वाटेल तेव्हा कोणीही करु शकत नाही. त्यासाठी धर्मगुरुंकडून आदेश मिळणं महत्त्वाचं आहे. जर एखादी व्यक्ती वृद्ध असेल किंवा उपचार होऊ न शकणाऱ्या आजाराने त्रस्त असेल तर अशा स्थितीत संथारा प्रथेचं पालन केलं जातं. संथारा घेतल्यानंत अन्न आणि पाण्याचा त्याग केला जातो. या काळात सर्व मोहमाया बाजूला ठेवून फक्त देवाचं स्मरण केलं जातं.
संथारा प्रथेमागील कारण काय?
इ.स.च्या चौथ्या शतकातील समंतभद्र यांनी लिहिलेला एक महत्त्वाचा जैन ग्रंथ रत्नाकरंद श्रावकचरमध्ये संथारा व्रता आणि ते कसे पाळावं याबद्दल सांगण्यात आलं आहे. या ग्रंथात म्हटलं आहे की, आत्म्याला शरीरापासून मुक्त करण्यासाठी हे व्रत घेतलं पाहिजे जसं की नैसर्गिक आपत्ती, वृद्धापकाळ किंवा बरा न होणारा आजार.
तसंच हे व्रत घेणाऱ्या प्रत्येकाने त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवले पाहिजे, त्यांच्या सर्व संपत्तीचा त्याग केला पाहिजे आणि आपल्या प्रिय व्यक्तींपासून मानसिकरित्या वेगळं झालं पाहिजे. त्यांनी सर्वांना क्षमा करावी, क्षमा मागावी आणि त्यांच्या चुकांबद्दल पश्चात्ताप करावा. त्यानंतर, शांत मनाने त्यांनी प्रार्थनेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि हळूहळू खाणं-पिणं थांबवावं आणि मृत्यूपर्यंत उपवास करावा.
इतर धर्मांमध्ये अशा प्रथांचा उल्लेख
संथाराचा निर्णय पूर्णपणे संबंधित व्यक्तीवर अवलंबून आहे. यासाठी कोणावरही बळजबरी किंवा दबाव निर्माण करता येणार नाही. मुलं आणि तरुणांना हे करण्याची परवानगी नाही. संथाराची परंपरा केवळ जैन धर्मातच नाही तर इतर धर्मांमध्येही दिसून येते.
संथारा कायदेशीर आहे का?
जैन धर्मात संथारा प्रथा स्विकारण्यात आला असून, तिला फार आदर आहे. मात्र आपल्याकडे या प्रथेला अनेक कायदेशीर आव्हानांचा सामना करावा लागला. 2015 मध्ये, राजस्थान उच्च न्यायालयाने कलम 306 अंतर्गत संथारा बेकायदेशीर मानली पाहिजे असा निर्णय दिला होता. स्वतःचे जीवन संपवण्याचा स्वेच्छेने घेतलेला निर्णय हा स्वतःला हानी पोहोचवण्याचा एक प्रकार आहे आणि धार्मिक प्रथा म्हणून त्याचे समर्थन करता येत नाही असं कोर्टाने सागितलं होतं.
राजस्थान उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात जैन समुदायाकडून निषेध करण्यात आला. जैन समाजातील संस्था, व्यक्तींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. एका महिन्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने या आदेशाला स्थगिती दिली आणि धार्मिक स्वातंत्र्य संरक्षणाखाली संथरा सुरू ठेवण्याची परवानगी दिली.