पुणे :- संत तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज आणि व्याख्याते शिरीष महाराज मोरे यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी भावनिक चिठ्ठी लिहीत कुटुंबीय व मित्र परिवाराची माफी मागितली आहे. त्याचवेळी स्वतःवर असलेल्या कर्जाची माहितीही या चिठ्ठीत नमूद केली आहे. या घटनेनंतर देहू परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आज सकाळी शिरीष महाराज मोरे यांनी आपल्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. सुरुवातीला या आत्महत्येमागे नेमकं कारण काय याबाबत साशंकता होती. मात्र पोलिसांच्या तपासात शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चार वेगवेगळ्या चिठ्ठ्या मिळून आल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी आर्थिक अडचणींबरोबरच विविध भावना व्यक्त केल्या आ शिरीषमहाराजांनी लिहिलेल्या पहिल्या चिठ्ठीतून आई, वडील आणि बहिणीला, दुसऱ्या चिठ्ठीतून होणाऱ्या पत्नीला, तिसऱ्या चिठ्ठीतून कुटुंबीय आणि चौथ्या चिठ्ठीतून मित्रांना शेवटचा संदेश दिला आहे. एका चिठ्ठीत त्यांनी आपल्यावर ३२ लाख रुपयांचं कर्ज असल्याचं नमूद केलं आहे. आपण हे कर्ज फेडू असं वाटत होतं, मात्र आता लढण्याची ताकद उरलेली नाही. त्यामुळं मला हे टोकाचं पाऊल उचलावं लागत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
माझ्यावरील कर्ज फेडण्यासाठी कुटुंबीयांना साथ द्या अशी भावनिक सादही त्यांनी आपल्या मित्रांना घातली आहे. तसेच आई, वडील, बहीण आणि होणाऱ्या पत्नीचीही त्यांनी माफी मागितली आहे. आपण होणाऱ्या पत्नीला अनेक स्वप्नं दाखवली, मात्र ती पूर्ण न करताच आपला प्रवास थांबवतोय. मला तिला वेळ देता आला नाही. मात्र आता तिच्यासाठी चांगला मुलगा बघून लग्न करून द्या अशीही विनवणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, शिरीष महाराज यांचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झालेला होता. लवकरच ते विवाहबद्ध होणार होते. मात्र तत्पूर्वीच त्यांनी टोकाचं पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली. त्यामुळे देहू परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आर्थिक अडचणीतून त्यांनी आत्महत्येचा पर्याय निवडल्याचं त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठ्यांमधून समोर आलं आहे.