Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रवेध मुत्सद्देगिरीचा...: निरुपमा राव : आव्हानांवर मात करत विस्तारला परीघ

वेध मुत्सद्देगिरीचा…: निरुपमा राव : आव्हानांवर मात करत विस्तारला परीघ

[ad_1]

डॉ. रोहन चौधरी1 तासापूर्वी

  • कॉपी लिंक

जागतिक राजकारणातील महिलांचे स्थान हा कायमच चिंतेचा आणि चिंतनाचा विषय राहिला आहे. महानता, उदात्ततेच्या परिमाणांमध्ये स्त्रियांची प्रतिमा बंदिस्त करुन, त्यांच्या यशाचे मार्ग मर्यादित ठेवण्यातच आपला समाज धन्यता मानतो. त्यामुळे आपल्या दृष्टिकोनातील महिलांविषयीचा कळवळा आणि वास्तव यात जमीन-अस्मानाचे अंतर दिसते. मुत्सद्देगिरीची दुनियाही या परिस्थितीला अपवाद नाही. आपल्याकडे विजयालक्ष्मी पंडित यांच्यापासून गायत्री इसार कुमार ते सुजाता सिंग यांच्यापर्यंत मुत्सद्देगिरीची एक परंपरा राहिली आहे. पण, आपल्यापैकी किती जण या नावांशी आणि त्यांच्या कार्याशी परिचित आहोत? या महिलांच्या कारकिर्दीत भारताच्या परराष्ट्र धोरणात मूलभूत बदल झाला आहे किंवा या महिलांनी पुरुषांपेक्षा वेगळी भूमिका घेतली, असे मानण्याचे काही कारण नाही. मुद्दा आहे, तो प्रतिनिधित्त्वाचा.महिलांच्या बाबतीत असलेल्या एकूणच प्रतिकूल परिस्थितीत, परराष्ट्र धोरणातील सामाजिक प्रतिनिधित्वाचा आश्वासक चेहरा निरुपमा राव यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. चीनमधील भारताच्या पहिल्या महिला राजदूत, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या पहिला महिला प्रवक्त्या आणि भारताच्या माजी परराष्ट्र सचिव अशा महत्त्वाच्या पदांची जबाबदारी राव यांनी सांभाळली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून इंग्रजी साहित्यातून पदवी घेतलेल्या राव यांनी १९७३ मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत प्रवेश केला. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या, श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्त, चीनमधील राजदूत आणि परराष्ट्र सचिव म्हणून त्यांनी पार पाडलेली कामगिरी अत्यंत आव्हानात्मक होती.राव या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या असताना देशाच्या परराष्ट्र धोरणावर दीर्घकालीन प्रभाव पाडणाऱ्या घटना घडत होत्या. २००१ च्या जुलैमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आग्रा शिखर परिषदेमुळे दक्षिण आशियातील राजकारणात शांततेची संधी चालून आली होती. १९९९ च्या कारगिल युद्धाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेली कटुता दूर करून नवा अध्याय सुरू करण्याचा हा प्रयत्न होता. भारतातील जनमानस आणि राजकीय भावना पाहता, या संवादाच्या यशापयशापेक्षा त्याची गरज अधोरेखित करणे अधिक महत्त्वाचे होते. २००१ च्या डिसेंबरमध्ये भारताच्या संसदेवर झालेला दहशतवादी हल्ला हा परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्ता म्हणून राव यांच्यासमोरचे दुसरे आव्हान होते. हा हल्ला पाकिस्तान पुरस्कृत आहे, याबद्दल भारतीयांच्या मनात कोणतीही शंका नव्हती. त्यावेळी गरज होती, ती पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाबद्दल दुटप्पीपणे वागणाऱ्या अमेरिकेला निक्षून सांगण्याची आणि पाकिस्तानचे खरे रूप जगासमोर आणण्याची. राव यांच्यातील मुत्सद्द्याने नेमकी हीच बाब हेरली. आज मागे वळून पाहताना त्यांनी ही जबाबदारी खूप संयमाने आणि यशस्वीपणे निभावल्याचे दिसते. अशा एखाद्या घटनेची निव्वळ माहिती देणे एवढीच परराष्ट्र प्रवक्त्याची जबाबदारी नसते, तर त्या घटनेच्या प्रतिक्रियेतून योग्य तो राजकीय आणि राजनयिक संदेश दिला जाणे अधिक महत्त्वाचे असते. हा संदेश कसा द्यायचा, याचा वस्तुपाठच राव यांनी घालून दिला.राव २००६ मध्ये चीनमधील भारताच्या पहिल्या महिला राजदूत बनल्या. चीनचे तत्कालीन राष्ट्रपती हू जिंताओ यांची भारत भेट तसेच आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची चीन भेट या त्यांच्या कार्यकाळातील राजकीय पातळीवरच्या महत्त्वाच्या घटना होत्या. राजदूत हा केवळ देशाचा राजनयिकच नव्हे, तर आर्थिक आणि सांस्कृतिक प्रतिनिधीही असतो, याची जाणीव राव यांना होती. त्यांच्या कार्यकाळात ऑक्टोबर २००७ मध्ये चीनमधील ग्वांगझौ येथे भारतीय वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच ‘भारत – चीन व्यवसाय मंच’ही स्थापन करण्यात आला. भारत आणि चीन यांच्यातील संबंधाला राजकीय विषयापुरते मर्यादित न ठेवता, व्यापार तसेच गुंतवणुकीशी संबंधित क्षेत्रात अधिक लक्ष केंद्रित करणे, हा या मंचाचा उद्देश होता. राव यांच्या पुढाकाराने २००९ मध्ये भारताने चीनच्या पश्चिमेकडील निमगिया प्रांतात शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण आणि माहिती केंद्र स्थापन केले. भारत – चीन संबंधांच्या इतिहासात अशा प्रकारचा पुढाकार प्रथमच घेण्यात आला होता. त्या माध्यमातून शेती हा विषयही दोन्ही देशांच्या परिघात यावा, अशी राव यांची इच्छा होती.राजकीय आणि आर्थिक पातळीवरील संबंधांबरोबरच भारत – चीन संबंधांना सांस्कृतिक आयाम देण्याचा प्रयत्नही राव यांनी आपल्या कार्यकाळात केला. या उद्देशाने त्यांनी भारतीय दूतावासाच्या सांस्कृतिक विभागाचा चीनमध्ये विस्तार करण्यास प्रारंभ केला. चिनी विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीचे दर्शन व्हावे तसेच संगीत आणि नृत्य या कलांची ओळख व्हावी, या उद्देशाने हा विभाग कार्यरत राहावा, अशी त्यांची मनीषा होती. त्यामुळे अशा विविध उपक्रमांद्वारे भारतीय परराष्ट्र धोरणाचा परीघ वाढवण्याचे श्रेय निश्चितच त्यांना जाते. आपल्यापुढील आव्हानाचे संधीत रुपांतर करून राव यांनी परराष्ट्र सेवेत करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणींसाठी आदर्श निर्माण केला. मुत्सद्देगिरीइतकेच त्यांच्या कारकिर्दीचे हे एक मोठे यश मानावे लागेल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments