
नुकतीच संक्रात झाली. घरात करून ठेवलेला तिळगुळ अजून संपलेला नाही. पाहुण्यारावळ्यांचा तिळगुळ येत आहे. आपण तिळगुळ खाण्याची संधी सोडत नाही. आता हळूहळू दिवस तिळातिळानं वाढत जाईल आणि उन्हाळा सुरू होईल. पण, तिळाच्या आठवणी जिभेवर आणि मनावर रेंगाळतच राहतील. संक्रात आली की मला माझ्या लहानपणीची संक्रात आठवू लागते. आज सर्वच गोष्टींचा सुकाळ आहे, तेव्हा सगळ्या गोष्टींचा दुष्काळ होता. पण, त्या दुष्काळातही जो गोडवा होता, तो आज आठवणींनाही खूप खूप गोड करतो आहे.तिळगुळातल्या गुळाची गोडी तेव्हा आमच्या लेखी फारच होती. साखर हा प्रकार तेव्हा माहीत नव्हता. मी ही साठ वर्षांपूर्वीची गोष्ट सांगतोय. माझ्या त्या छोट्याशा खेड्यातील दुकानातही साखर कमीच असायची. कारण गावात कुणी फारसे साखर वापरतच नसे. गुळाची ढेप मात्र किराणा दुकानात असायची. सराट्याने किंवा एखाद्या मोठ्या गजाने ती ढेप टोकरून दुकानदार गुळ मोजून द्यायचा. छटाकभर किंवा दोन छटाक एवढ्याच मापात लोक गूळ घ्यायचे. कुणी किलोभर गूळ घेतलाय किंवा ढेपच विकत घेतली, असं कधी व्हायचं नाही. त्यामुळं गुळाचा खडा खायला लेकरं मिडकत असत. त्यांना खूप गूळ खावा वाटायचा, पण क्वचित लहानसा खडा त्यांच्या हातावर ठेवला जायचा. तो खडा चॉकलेट खाल्ल्यासारखा मुलं चघळून चघळून खायची. कुणी पाहुणेरावळे आले तर घरी चहासाठी आणलेल्या गुळाचा बारकासा खडा काढून लहान लेकराला दिला जायचा. पण, ते हात पुढे करत नसे. कारण त्या लेकराला गुळाच्या गोडीप्रमाणंच त्याची दुर्मिळताही माहीत असायची. त्यामुळं आमच्या लेखी गूळ ही खूप गोड; पण अत्यंत महागडी, दुर्मिळ अशी गोष्ट होती.आमच्या गावात १९७० च्या दरम्यान कॅनॉलचं पाणी आलं आणि १९७५ पासून ऊस लावायला सुरूवात झाली. वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षापर्यंत आम्हाला ऊसही खायला मिळायचा नाही. पाहुण्यांच्या गावी, आमच्या आजोळी ऊस असायचा. आमचं आजोळच वहिनींचं गाव होतं. त्यांच्या वडिलांच्या शेतातही ऊस होता. थळ लागलं की ऊस खाण्याचं, रस पिण्याचं निमंत्रण असायचं. तिथून कधी तरी पाक आणि थोडासा गूळ भेट म्हणून यायचा. कधी कधी एखादी ढेपही यायची. ही ढेप आई वर्षभर पुरवायची. ती पोत्याच्या कापडात बांधून ठेवली जायची. ढेप संपल्यावर तो कपडा धुवून त्याच्या गोड पाण्यात भात शिजवला जायचा. तो गोड भात सगळं घर खायचा. हा गोड पदार्थही आमच्यासाठी दुर्मिळच होता.पुढे आमच्या शेतातही ऊस लावला जाऊ लागला. तो गुऱ्हाळावर नेला जाऊ लागला. गावातही एक गुऱ्हाळ सुरू झालं. मग ऊस, रस, पाक, गूळ या सगळ्याच गोष्टींची चंगळ झाली. आमच्या जिभेला गुळाची जी चव चिकटलेली होती, त्यामुळं साखर पांचट लागायची. कारण गुळाची गोडी विलक्षण आवडायची. त्यामुळं संक्रातीच्या काळात तिळगुळाचे लाडू खायला मिळणे ही मोठी पर्वणीच असायची. गोड पदार्थांपैकी पुरणाची पोळी हा पदार्थ जसा सर्वात जास्त आवडीचा होता, त्यापेक्षाही तिळगुळाचे लाडू हा पदार्थ आणखीच जास्त आवडायचा. गोड पदार्थांत क्रमवारी लावायची झाली, तर सगळ्यात पहिला क्रमांक तिळगुळाचा येतो. त्यात भाजलेल्या तिळाची चव आणि गुळाची गोडी इतकी विलक्षण मिसळलेली असायची की नुसत्या आठवणीनेही जिभेला पाणी सुटायचं. इतकी त्या गोडीची चव जिभेवर रेंगाळलेली असायची. त्यामुळे आजही आम्हाला जगातली सर्वात चवदार गोष्ट काही वाटत असेल, तर ती तिळगुळ हीच आहे.दिवाळीच्या मागंपुढं शेतातून तीळ आणि संक्रातीच्या आसपास गुऱ्हाळातून गूळ घरी यायचा. संक्रातीच्या निमित्तानं या दोघांचं मिलन व्हायचं, ते आयुष्यात विलक्षण चव आणायचं. तिळाच्या आधी वर्षभर तिळगुळ खायला मिळण्याचा प्रश्नच नव्हता. हौस म्हणून आज आपण कधीही तिळाच्या पोळ्या करतो, लाडू करतो. कारण आज तीळ आणि गूळ, साखरही भरपूर उपलब्ध आहे. पण तेव्हा असं नसायचं. तिळगुळाचे लाडू फक्त संक्रातीलाच खायला मिळायचे. त्यामुळं बुंदीच्या लाडूसाठी दिवाळीची वाट बघावी लागायची, तशी तिळगुळाच्या लाडूसाठी संक्रातीची वाट पाहावी लागायची. आणि तेही मर्यादित असायचे. एक मात्र असायचं, या काळात आई तिळगुळ घेऊन मला पाहुण्यांच्या गावी पाठवायची. म्हणजे आजोळी, वहिनींच्या माहेरी, बहिणीच्या सासरी. प्रत्येक पाहुण्याकडं गेलं की आपली तिळगुळाची पिशवी द्यायची आणि त्यांनी दिलेला तिळगुळ घेऊन घरी यायचं. त्यांच्या घरी आम्हाला तिळाचा लाडू खायला मिळायचाच. त्यामुळं हा तिळगुळाचा मुराळी होणं खूप फायद्याचं आहे, असं वाटायचं. मी सगळ्या आत्या, बहिणींसोबत नेहमीच त्यांच्या गावी जात असल्यामुळं हा तिळगुळ घेऊन जाण्याचं गोड काम मी आनंदानं करायचो.घरच्या उसाचा भरपूर गुळ घरी येऊ लागला. घरात गुळाच्या ढेपा ठेवलेल्या असायच्या, तेव्हा मात्र आधीसारखा वडीलधाऱ्यांसमोर गुळासाठी हात पसरावा लागायचा नाही. ढेप सोडून ठेवलेली असायची. जवळच सराटा ठेवलेला असायचा. त्या सराट्यानं गुळाच्या खपल्या काढून हव्या तेवढ्या खाता यायच्या. मी भरपूर गूळ खायचो. मला सगळे गोडघाशा म्हणायचे. गुळामुळं पोटातली उष्णता वाढायची. कधी कधी घोळणा फुटायचा. म्हणजे नाकातून रक्ताचे थेंब पडायला लागायचे. माझी बहीण गूळ तळायची आणि तळलेला गूळही विलक्षण चवदार लागायचा. त्यात कधी कधी शेंगदाणे टाकले, तर त्याची बाजारात मिळते तशी चिक्की व्हायची. तीसुद्धा विलक्षण चवदार लागायची. सगळे शेतात निघून गेले की, माझी बहीण आणि मी अशी चिक्की करून खायचो. सगळे शेतात निघून गेले की बहीण हळूच गूळ काढायची, चूल पेटवायची, त्यावर तवा ठेवून थोडसं तेल टाकायची. तेल कढलं की त्यात गूळ टाकायची. तो पातळ झाला की त्यात भाजलेले शेंगदाणे टाकून तवा खाली उतरवायची. हे मिश्रण थोडा वेळ हलवलं की एकजीव व्हायचं. तव्याला तेल लावल्यामुळं थोडा वेळ थंड झालं की गुळाची रेवडी तयार व्हायची. नंतर आम्ही तिचे तुकडे करून पोटभर खायचो. सगळं खाऊन झालं की बहीण सराटा, तवा सगळं घासून पुसून ठेवायची. पण, असा गूळ खाऊन खाऊन उष्णता वाढल्यानं सारखे घोळणे फुटू लागले, तेव्हा आईला संशय आला की हे गुळ तळून खात असावेत. त्या घोळण्यानं घोळ व्हायचा आणि आमची चोरी उघडी पडायची. inbhalerao@gmail.com
Source link