
डॉ. नरेंद्र जाधव13 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
देशापुढील आव्हानांच्या पार्श्वभूमीवर १९९२ चा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी त्यावर अखेरचा हात फिरवताना डॉ. मनमोहन सिंग. या काळात सुरू झालेल्या आर्थिक सुधारणांनी पुढे नवा इतिहास घडवला. (छायाचित्र स्त्रोत : इंटरनेट)
मनमोहन सिंग नावाच्या ‘तज्ज्ञ’ डॉक्टराने रुग्णशय्येवर निपचित पडलेल्या अर्थव्यवस्थेचे अचूक निदान केले अन् योग्य वेळी नेमके उपचार दिले, म्हणून ती खडखडीत बरी झाली. आज तिची सुधारलेली ‘तब्येत’ पाहताना जसा आनंद होतो, तसा हे ‘डॉक्टर’ नसते तर काय झाले असते? या विचाराने मनात काहूरही उठते. विसाव्या शतकाच्या अखेरीस रसातळाला जाऊ लागलेल्या या देशाला एकविसाव्या शतकासाठी नवी उभारी देण्यात त्यांनी दिलेले योगदान इतिहास विसरणार नाही. तत्कालीन नियोजन आयोग आणि राष्ट्रीय सल्लागार परिषदेचे सदस्य म्हणून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा निकटचा सहवास लाभलेल्या अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी उलगडलेले त्यांच्या व्यक्तित्वाचे पैलू…
डॉ. मनमोहन सिंग हे राजकारणात येण्याच्या पूर्वी, किंबहुना ते राजकारणापासून दहा हात दूर होते, तेव्हापासून माझा त्यांच्याशी संपर्क होता. ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते आणि मी स्वतः ३१ वर्षे रिझर्व्ह बँकेमध्ये काम केले आहे. तिथे त्यांची जी कारकीर्द होती, ती निश्चितच चांगली होती, मात्र उत्तुंग अशी नव्हती. डॉ. मनमोहन सिंग खऱ्या अर्थाने सर्वपरिचित झाले, त्यांना अर्थतज्ज्ञ म्हणून थोरवी लाभली, ती ते अर्थमंत्री झाल्यावर!
दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर… आपल्या देशावर १९९१ मध्ये एक अभूतपूर्व आरिष्ट आले होते. देशाची वित्तीय तूट वाढत जाऊन राष्ट्रीय उत्पन्नाच्या साडेसहा टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. ती साडेतीन ते चार टक्के असावी असा संकेत आहे. एकीकडे सरकारी खर्चामध्ये बेसुमार वाढ आणि दुसरीकडे कर आकारणीत वाढ न होण्यामुळे ही तूट खूप वाढली होती. आता अशी कल्पनाही करता येत नाही, पण महागाईचा दर १७-१८ टक्क्यांवर पोहोचला होता. परिणामी परकीय चलनाची गंगाजळी आटत आटत जाऊन केवळ एक अब्ज डॉलर इतकीच उरली होती. आता देशाकडे असलेल्या परकीय चलनाची गंगाजळी जास्त आहे, कमी आहे की नेमकी आवश्यक तेवढीच आहे, हे ओळखण्याचा निकष काय? तर त्यावेळी हा निकष असा होता की, किमान चार महिन्यांच्या आयातीसाठी पुरेल इतका परकीय चलनाचा साठा आपल्याकडे असला पाहिजे. १९९१ मध्ये इतकी बिकट परिस्थिती निर्माण झाली होती की, फक्त पंधरा दिवसांच्या आयातीला पुरेल इतकाच परकीय चलनाचा मर्यादित साठा आपल्याकडे उरला होता. त्यामुळे देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचला होता.
त्या आधीचे आपल्या अर्थव्यवस्थेचे ट्रॅक रेकॉर्ड अतिशय उत्तम होते. देशावरील सगळी कर्ज आपण वेळेवर फेडत आलो होतो. कर्ज काही प्रमाणात वाढले होते, पण त्याची परतफेड नियमितपणे होत होती. पण, १९९१ च्या मे महिन्यात अशी दारुण परिस्थिती उद्भवली की, आपल्याकडे तेलाच्या आयातीलाही पैसे राहिले नव्हते. आणि तेलाची आयात थांबली असती, तर काय झाले असते? सगळे उद्योग-धंदे बंद पडले असते. म्हणजे अगदी फूटवेअरपासून ते कॉम्प्युटरच्या हार्डवेअर- सॉफ्टवेअरपर्यंत सगळ्या गोष्टींचे उत्पादन थांबले असते. अशा या अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये निर्णायक स्वरुपाचे आर्थिक धोरण अत्यंत आवश्यक होते. स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात भारतीय अर्थव्यवस्था एवढी विकलांग कधीच झाली नव्हती. जगातील कोणताही देश आपल्याला मदत करायला तयार नव्हता. भारताचे नाव जगाच्या आर्थिक इतिहासातून पुसले जाईल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी आपल्याला ४७ टन सोने गहाण ठेऊन पैसे उभे करावे लागले.
धोरणे बदलली, स्थिती पालटली अशा या विदारक पार्श्वभूमीवर देशात नवे सरकार आले. त्यामध्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे अर्थमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आणि इथूनच त्यांच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने झळाळी आली. त्यांनी अर्थव्यवस्थेची धुरा समर्थपणे पेलली आणि देशाच्या एकूणच अर्थकारणाला नवी दिशा दिली. त्यांनी जे धोरण स्वीकारले, त्याला ‘खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण’ (खाउजा) असे संबोधले जाते. देशातील उद्योजक – व्यावसायिक नियमांच्या बंधनात बांधले गेले होते. भारतीय अर्थव्यवस्थेला ‘लायसन्स आणि परमिट राज’ म्हटले जात होते. प्रत्येक गोष्टीसाठी कुठले तरी लायसन्स घ्यावे लागायचे, सरकारच्या कुठल्या तरी यंत्रणेचा त्रास सहन करावा लागायचा. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत वाईट स्थितीत सापडली होती.
डॉ. मनमोहन सिंगांनी त्यांच्या पहिल्याच अर्थसंकल्पातून मोठा धक्का दिला आणि अशा सगळ्या बंधनांमधून देशातील उद्योजकांची सुटका केली. त्यामुळे भारतीय उद्योजकांची उद्यमशीलता झपाट्याने वाढत गेली. त्यातूनच अर्थव्यवस्था तर सावरलीच; पण पुढच्या प्रगतीची मजबूत पायाभरणीही झाली. १९५१ ते १९९१ या चाळीस वर्षांत आपल्या देशाच्या आर्थिक विकासाचा दर केवळ ३.५ टक्के, तर लोकसंख्या वाढीचा दर २.२ टक्के होता. म्हणजे आपले दरडोई उत्पन्न वर्षाला फक्त १.३ टक्के इतक्या अत्यंत धीम्या गतीने वाढत होते. देशाच्या आर्थिक विकासाची गती हीच राहिली असती, तर आपले दरडोई उत्पन्न दुप्पट व्हायला जवळपास ५८ वर्षे लागली असती. डॉ. मनमोहन सिंगांनी हे चित्र बदलले. त्यांनी जी धोरणे स्वीकारली त्यामुळे आर्थिक विकास वेगाने सुरू झाला. १९९२ ते २००२ या काळात विकासाचा दर सरासरी ६ टक्क्यांवर जाऊन पोहोचला. त्यानंतर २००२ ते २००५ मध्ये तो ८ टक्क्यांवर गेला. पुढे २००८ मध्ये तो तब्बल ९.५ टक्क्यांवर पोहोचला.
वज्रादपि कठोराणि मृदूनि कुसुमादपि अत्यवस्थ स्थितीत गेलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेचे हे खऱ्या अर्थाने पुनरुज्जीवन होते. फुलासारख्या मृदू व्यक्तिमत्वाच्या डॉ. मनमोहन सिंगांनी ज्या वज्रासारख्या कणखरपणे नवी धोरणे राबवली, त्यामुळेच तिला ही संजीवनी लाभली. त्यामुळे नव्वदच्या दशकात आणि त्यानंतरच्या काळात देशाच्या जो आर्थिक विकास होत गेला, त्याचा पाया भक्कम करण्याचे श्रेय डॉ. सिंग यांच्याकडेच जाते. आज आपण जी प्रगती अनुभवतो आहे, तिची बीजे त्यांनी १९९१ च्या विपरित परिस्थितीत रुजवली होती, हे कुणीही नाकारु शकत नाही. एका अर्थाने आधुनिक भारतीय अर्थव्यवस्थेची पायाभरणी करण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य डॉ. सिंग यांनी केले.
ऋषितुल्य व्यक्तित्व, कमालीची ऋजुता डॉ. सिंग पुढे पंतप्रधान झाले. या सगळ्या कालखंडामध्ये माझा व्यक्तिगत रुपात त्यांच्याशी अत्यंत निकटचा संबंध होता. मी त्यांचा जणू मानसपुत्रच होतो. २००५ मध्ये त्यांनी माझ्या सात पुस्तकांचे प्रकाशन पंतप्रधान निवासस्थानात आयोजित केले. तो सोहळा आणि पुढेही त्यांच्याकडून लाभलेला स्नेह हा माझ्यासह आमच्या कुटुंबीयांसाठी ‘मर्मबंधातली ठेव’ आहे. स्वत: पंतप्रधान हे पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या नियोजन आयोगावर सदस्य म्हणून २००९ मध्ये त्यांनी माझी निवड केली. त्याचदरम्यान, श्रीमती सोनिया गांधी या अध्यक्ष असलेल्या राष्ट्रीय सल्लागार परिषदेवरही माझी नेमणूक करण्यात आली. त्यामुळे या दोन्ही नेत्यांसोबत एकाच वेळी काम करण्याची संधी मला मिळाली. नियोजन आयोगाचा सदस्य म्हणून डॉ. सिंग यांनी माझ्याकडे अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. त्यामुळे त्यांच्याशी माझा नियमित संपर्क यायचा. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे, नेतृत्वाचे, प्रशासकीय कौशल्याचे आणि दूरदृष्टीचे अनेक पैलू मला जवळून अनुभवता आले. यातून मला खूप शिकता आले, माझे ज्ञान नव्याने उजळत गेले.
या सगळ्या ३५ वर्षांच्या प्रवासात मला उमगलेले डॉ. मनमोहन सिंग हे एक अत्यंत ऋषितुल्य असे व्यक्ती होते. ते अतिशय साधे, निगर्वी आणि विनम्र होते. आणि त्यांची ही विनम्रता खरी होती. बऱ्याच लोकांकडे खोटी विनम्रता असते, तशी ती त्यांच्याकडे नव्हती. एका सच्चा देशभक्ताची नम्रता त्यांच्या ठायी होती. विशेष म्हणजे, आपल्यावर टीका झाली, तरी ती शांतपणे ऐकत असत, त्यातून काही सुधारणा करता येईल का, याकडे लक्ष देत असत. टीका करणाऱ्यांवरतीच टीका करायची, हे त्यांचे कधीच तंत्र नव्हते. त्यांचा मोठेपणा म्हणजे, एवढे सगळे काम करुनही त्यांची वृत्ती मात्र अत्यंत विनयी, सात्विक अशी होती. एवढ्या सर्वोच्च पदावर पोहोचलेल्या व्यक्तीकडे इतकी कमालीची ऋजुता असू शकते, याची अनुभूती त्यांच्या सहवासाचा लाभ झालेल्या माझ्यासारख्यांना नक्कीच येत असे.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने एका द्रष्टा अर्थनीतिकार आणि निष्ठावान देशभक्त काळाच्या पडद्याआड गेला आहे. या ‘तज्ज्ञ’ डॉक्टराने रुग्णशय्येवर निपचित पडलेल्या आपल्या अर्थव्यवस्थेचे अचूक निदान केले अन् योग्य वेळी नेमके उपचार दिले, म्हणून ती खडखडीत बरी झाली. आज तिची सुधारलेली ‘तब्येत’ पाहताना जसा आनंद होतो, तसा हे ‘डॉक्टर’ नसते तर काय झाले असते? या विचाराने मनात काहूरही उठते. त्यामुळे विसाव्या शतकाच्या अखेरीस रसातळाला जाऊ लागलेल्या या देशाला एकविसाव्या शतकासाठी नवी उभारी देण्यात डॉ. मनमोहन सिंग यांनी दिलेले योगदान येणाऱ्या शतकांचा इतिहासही विसरणार नाही. त्यांना भावपूर्ण आदरांजली..!
(संपर्कः drnarendra.jadhav@gmail.com)