
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर भाजपप्रणित महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत येणार हे निश्चित झाले असले तरी मुख्यमंत्रिपदाबाबत संभ्रम कायम आहे. निवडणुकीपूर्वी राज्याची सूत्रे हाती घेतलेले एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते, मात्र त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी शहा जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचे सांगत मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडला. शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली असून देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागल्यास मराठा समाज नाराज होण्याची अटकळ बांधली जात आहे. त्याचबरोबर शिंदे यांच्या या ‘त्यागा’चा उद्धव ठाकरेंना फायदा होणार असून महायुतीचे नुकसान होणार का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत तर त्यांच्या भूमिकेवर आणि शिवसेनेच्या जनाधारावर काय परिणाम होईल, हेही समजून घ्यावे लागेल.







