फलटण :- फलटण-कोरेगांव विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार चांगलाच रंगात आला आहे. संविधान समर्थन समितीच्या पाठिंब्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वाभिमानी पक्ष व परिवर्तन महाशक्तीच्या अधिकृत उमेदवार प्रा. रमेश आढाव यांनी मतदारांमध्ये भेटीगाठी घेत प्रचारात आघाडी घेतली आहे. “दोघंही नको; तिसराच बरा!” अशी भावना मतदारांमध्ये निर्माण झाली आहे, असं चित्र सध्या दिसून येत आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी या संदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, “शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अनेक आंदोलने केली आहेत. याच संघर्षामुळे शेतकरी समाजात संघटनेबद्दल एक विश्वास निर्माण झाला आहे. आमचे उमेदवार प्रा. रमेश आढाव हे अनुभवी पत्रकार असून, शिस्तबद्ध, मितभाषी आणि मतदारसंघातील समस्यांची स्पष्ट जाण असणारे व्यक्तिमत्व आहेत.
प्रा. रमेश आढाव यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध समित्यांवर काम करताना प्रशासकीय कौशल्य सिद्ध केले आहे. गुणवरे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अल्प काळात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. समाजातील सर्व घटकांशी सलोखा ठेवण्याची कला, दांडगा जनसंपर्क, आणि प्रशासकीय कामं करून घेण्याची हातोटी यामुळे मतदार निश्चितच त्यांना पसंती देतील,” असा विश्वास महामुलकर यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, “प्रचारादरम्यान मतदारसंघातील विचित्र राजकारणाबद्दल मतदार उघडपणे बोलत आहेत. कुणाच्याही प्रभावाखालील व्यक्तीला निवडून देण्याऐवजी, स्वतंत्र चेहरा असलेल्या प्रा. रमेश आढाव यांना निवडून देण्याची मतदारांची मानसिकता आहे. त्याचप्रमाणे आम्ही पारंपारिक राजकारणाला छेद देऊन परिवर्तन घडवण्यासाठी कटिबद्ध आहोत. २० तारखेला होणाऱ्या मतदानातून मतदार ‘क्रांती’ घडवतील आणि २३ तारखेला फलटणला प्रा. रमेश आढाव यांच्या रुपाने नवीन नेतृत्त्व मिळेल,” असा आत्मविश्वास महामुलकर यांनी व्यक्त केला आहे.