
जोरदार पाऊस त्यातच रेल्वे सेवा देखील उशिराने सुरू असल्याने, सकाळीच कामासाठी घराबाहेर पडलेल्या कामगार वर्गाला मात्र मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या या पावसामुळे मुंबई शहर, उपनगर, ठाणे, कल्याण आणि डोंबिवली परिसरात सध्या जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळतेय. या भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू असून, नेहमीप्रमाणेच सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही तास पावसाचा हा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.