
मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकार कोणती पावलं उचलत आहेत, यावर मराठा आंदोलक बारीक लक्ष ठेवून आहेत. मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे राज्यभर दौरे सुरू असून आरक्षणासाठी येत्या २४ डिसेंबरपर्यंत राज्य सरकारला कालावधी दिलेला आहे. परंतु २४ डिसेंबरला राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात काहीच घोषणा केली नाही तर मराठा आंदोलनाची पुढची दिशा काय असेल, याबाबत खल करण्यासाठी १७ तारखेला समाजाची महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. ही सभा जालना जिल्ह्यात अंतरवली सराटी या गावात होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी याबाबत माहिती दिली.






