
गुजरात हायकोर्टाने मंगळवारी म्हटले की, लोकांच्या सुविधेसाठी मुक्या प्राण्यांचा बळी देणे योग्य नाही. भटक्या प्राण्यांच्या समस्येपासून सुटकारा मिळवण्यासाठी राज्य सरकारच्या धोरणानुसार पांजरपोळात ठेवलेल्या ३० गायींच्या मृत्यू प्रकरणी सुनावणी दरम्यान न्यायालयाने ही टिप्पणी केली. न्यायमूर्ति आशुतोष शास्त्री आणि न्यायमूर्ती हेमंत प्रच्छक यांच्या खंडपीठाने म्हटले की, नडियाद नगरपालिकेच्या हद्दीत मृत गायींचे अवशेष उघड्यावर टाकल्याचे फोटो मन व्यथीत करणारे आहेत.
या प्रकरणी न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे. नडियाद हद्दीत गायींच्या सांगाड्यांचे जे फोटो समोर आले आहेत ते अस्वस्थ करणारे आहेत. या प्रकरणात नडियादचे रहिवासी मौलिक श्रीमाली यांनी अवमान याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने हे म्हटलं आहे. त्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.
श्रीमाली यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते की, त्यांना पांजरपोळात ३० गायींच्या मृत्यूची माहिती मिळाली. त्यानंतर या गायींचे अवशेष उघड्यावर टाकल्याचे समोर आले. न्यायमूर्ती शास्त्री यांनी म्हटले की, हे मनाला अस्वथ करणारे आहे. लोकांच्या सोयीसाठी मुक्या प्राण्यांचा बळी दिला जाऊ शकत नाही. जर असे होत असेल तर या कृतीसाठी आपल्याला देवही माफ करणार नाही. लोकांच्या सुविधेसाठी एकाही जनावरांचा बळी दिला जाऊ नये..”








