- Marathi News
- Opinion
- Divya Marathi Rasik Purvani ‘Tales Of My Story’ Written By Rumi Jafri On Actor JItuji
रूमी जाफरी2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
मी तुषार कपूरसाठी कॉलम लिहिला. त्यावर अनेकांनी मला मेसेज आणि फोन करून सांगितले की, तुम्ही तुषार कपूरबद्दल लिहिताय तर जितूजींबद्दल का नाही लिहिले? ते तर तुमचे जुने मित्र आहेत. म्हणून मग आजच्या माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये जितूजी अर्थात जितेंद्र यांच्याबद्दल…मी जितूजींच्या सहवासात घालवलेल्या क्षणांचा विचार करू लागलो तेव्हा अनेक किस्से आठवू लागले. त्यांनी सांगितलेले किस्से आणि त्यांच्यासोबत घालवलेले दिवसही. त्यांनीच सांगितलेला एक किस्सा आज मी तुम्हाला सांगणार आहे, तो असा…
जितूजी चित्रपटात अभिनेता म्हणून आले आणि आघाडीचा नायक बनण्यासाठी धडपडत होते, तेव्हा निर्माता, दिग्दर्शक सुबोध मुखर्जी त्यांना म्हणाले, ‘तुला एकट्याला मुख्य नायक म्हणून घेऊन चित्रपट बनवायचा आहे. पण, त्यासाठी एक अट आहे की, तू हेमामालिनी यांना या चित्रपटात नायिका म्हणून काम करण्यास तयार करावं.’ हेमामालिनी त्या काळातील मोठ्या नायिका होत्या. त्यांच्यासोबत मुख्य नायकाच्या भूमिकेत काम करणे म्हणजे स्वत:ही एक स्टार नायक म्हणून स्थापित होणे होते. जितूजी त्यांच्या मॅनेजरला जाऊन भेटले, परंतु त्या वेळी हेमामालिनी यांच्यविषयीचे सगळे निर्णय त्यांच्या आई घेत होत्या. लोक त्यांना अम्मा चक्रवर्ती असं संबोधायचे. जितूजी अम्मांना भेटले, पण त्यांनी नकार दिला.
जितूजींनी मला पुढे सांगत होते.. अम्मांनी नकार दिल्यावरही मी हिंमत सोडली नाही आणि त्यांच्या पाठीमागे लागलो. मी म्हणालो, तुम्ही जे म्हणाल ते मी करेन, मानधन जास्त मिळवून देईन. हवं तर माझे मानधनही तुम्हीच घ्या, पण तुमच्या मुलीला माझ्या चित्रपटात काम करू द्या. माझं करिअर सेट होईल. शेवटी अम्मांनी होकार दिला. मला खूप आनंद झाला. मी जाऊन सुबोध मुखर्जींना सांगितले. त्यांनी हेमामालिनींशी संपर्क साधला आणि त्यांना चित्रपटासाठी साइन केले. मी खूप आनंदात, उत्साहात होतो. त्यावेळी मी एल. व्ही. प्रसाद यांचा एक चित्रपट करत होतो. हेमामालिनी यांच्यासोबतचा चित्रपट ज्या दिवशी हिट होईल, त्यानंतरच आपण नवीन चित्रपट साईन करू, असा विचार करून मी नवे कोणतेही काम घेतले नव्हते. हेमामालिना यांच्या मॅनेजरने सुबोध मुखर्जींना ज्या तारखा दिल्या होत्या, त्याच मी एल. व्ही. प्रसाद यांना दिल्या होत्या. मी सुबोधजींना म्हणालो की, या तारखा तर मी प्रसादजींना दिल्या आहेत. त्यावर सुबोधजी म्हणाले की, हेमामालिनींच्या तारखा सहजासहजी मिळत नाहीत. तुला हेमालिनींसोबत नायक म्हणून काम करायचं असेल, तर तो चित्रपट सोडावा लागेल.
मग जितूजी थेट हैदरबादला एल. व्ही. प्रसाद यांच्याकडे गेले आणि तारखांबाबतची ही अडचण सांगितली. त्यांना म्हणाले, ‘मला हेमामालिनी यांच्यासोबत चित्रपट मिळाला आहे आणि तुम्हाला दिलेल्या तारखाच योगायोगाने त्यांनी त्या चित्रपटासाठी दिल्या आहेत. त्यामुळे मी तुमचा चित्रपट सोडू शकतो का?’ प्रसाद म्हणाले, ‘का नाही? मी तर एक छोटासा चित्रपट बनवतोय. मी दुसऱ्या कुणाला घेऊन तो करेन. तू तो चित्रपट कर.. ऑल द बेस्ट!’ त्यानंतर त्यांनी माझ्या तारखा रद्द केल्या.
जितूजींनी मला सांगितलं, ‘एखादा चित्रपट सोडल्यावर मला पहिल्यांदाच आनंद झाला होता. त्यानंतर मी हेमामालिनी यांच्यासोबतचा चित्रपट सुरू होण्याची वाट पाहू लागलो. त्या दरम्यान एक दिवस कुणीतरी येऊन मला सांगितले की, सुबोध मुखर्जीसोबत तू जो चित्रपट करतो आहेत आणि ज्याचा पुढच्या आठवड्यात मुहूर्त आहे, त्यात तू नाहीस तर शशी कपूर आहे. मला विश्वासच बसत नव्हता. मी धावतच सरळ सुबोध मुखर्जींकडे गेलो आणि विचारले, की या चित्रपटात मी नव्हे, तर शशी कपूर आहे, असे मला समजलेय, हे खरं आहे का? तर ते म्हणाले, की हो, हे खरं आहे. तेे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी म्हणालो, मी तुम्हाला हेमामालिनींना साइन करून दिले. यावर सुबोधजी म्हणाले, ‘आम्ही व्यवसाय करायला बसलोय. आम्ही आमच्या प्रोड्युसर आणि फायनान्सरला सांगितले तेव्हा ते म्हणाले की, तुमच्याकडे हेमामालिनी आहे, त्यामुळे तुम्हाला कोणताही मोठा हीरो मिळेल, तुम्ही जितूला का घेताय? म्हणून आम्ही शशी कपूरला घेतले.’
जितूजी म्हणाले, मी सुबोधजींना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण, त्यांनी माझे ऐकले नाही. आम्ही व्यवसाय करायला आणि हिट चित्रपट तयार करायला बसलोय, हेच सांगत राहिले. तोवर माझ्या हातातून एल. व्ही. प्रसाद यांचाही चित्रपट गेला होता, पण तरीही मी त्यांच्याकडे गेलो आणि जे माझ्यासोबत घडले, ते सगळे त्यांना सांगितले. ते म्हणाले, ‘बरे झाले, मी अजून तरी तुझ्या जागी दुसरा हीरो घेतला नाही. त्यामुळं तू परत ये.’ जितूजी सांगत होते, ‘अशाप्रकारे मी पुन्हा एल. व्ही. प्रसाद यांचा चित्रपट साइन केला आणि चित्रीकरणही सुरू झाले. त्या दरम्यान जेव्हा कधी मला शशी कपूर आणि हेमामालिनी यांच्या चित्रीकरणाविषयी समजायचे, एखाद्या सिनेनियतकालिकात त्यांचे फोटो पाहायचो, तेव्हा मनाला खूप वाईट वाटायचे. पण, नशिबाचा खेळ बघा. माझा चित्रपट – ‘जीने की राह’ ब्लॉक बस्टर हिट झाला. हेमामालिनी आणि शशी कपूर यांचा ‘अभिनेत्री’ चित्रपट फ्लॉप झाला.’ माणूस एक विचार करत असतो, परंतु नियती काही वेगळंच घडवत असते. जितूजी अतिशय सरळ, खुल्या मनाचे आणि परोपकारी माणूस आहेत. त्यांची ईश्वरावर श्रद्धा होती, म्हणून ईश्वरानेही त्यांच्यासाठी काही चांगला विचार करून ठेवला होता. त्यांना जो चित्रपट करायचा होता, ताे फ्लॉप झाला आणि जो त्यांना करायचा नव्हता, तो सुपरहिट झाला. या गोष्टीवरून इमाम बख़्श नासिख़ साहेबांचा एक शेर आठवतोय… जुस्तुजू करनी हर इक अम्र में नादानी है जो कि पेशानी पे लिक्खी है वो पेश आनी है। त्यानंतर जितूजींनी हेमामालिनींसोबत गहरी चाल, खुशबू, किनारा, मुजरिम असे बरेच चित्रपट केले. परंतु, आता फरक हा होता की, जितूजी स्वत: एक सुपरस्टार होते. ‘जीने की राह’साठी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा आणि लताजींना सर्वोत्कृष्ट गायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तर, जितूजींसाठी आज ‘जीने की राह’मधील हे गाणे ऐका… आने से उसके आए बहार, जाने से उसके जाए बहार.. बड़ी मस्तानी है, मेरी मेहबूबा… स्वत:ची काळजी घ्या. आनंदी राहा.
(लेखक- बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक)




