Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रनेटस्ट्रीम: टोबी : नव्या कानडी सिनेमाचा पाइक

नेटस्ट्रीम: टोबी : नव्या कानडी सिनेमाचा पाइक

नेटस्ट्रीम: टोबी : नव्या कानडी सिनेमाचा पाइक

[ad_1]

समीर गायकवाड5 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

कन्नड चित्रपट ‘टोबी’मध्ये पोस्टमार्टेम करणाऱ्या एका मध्यमवयीन तरुणाची गोष्ट आहे. मृत व्यक्तींच्या देहाची चिरफाड करायची, कवटी फोडायची, इकडे तिकडे छेद घ्यायचे आणि नंतर टाके घालायचे, हे त्याचं रोजचं काम. त्याचबरोबर गावात कुणाला गायब व्हायचं असेल किंवा कुणाला चार-आठ दिवस लपून राहायचं असेल, तर टोबी हा महत्त्वाचा माणूस. पडक्या घरामध्ये तो आणि त्याची दहा-अकरा वर्षांची मुलगी- जेनी हे दोघेच राहतात. त्याची जगण्याची अशी मोठी स्वप्नं नाहीत. अपेक्षाही कमी आहेत. एके दिवशी स्टेशनजवळ एका सुंदर मुलीला पाहिल्यावर तिच्याशी लग्न करायचं स्वप्न तो पाहतो. त्याची मुलगीही या गोष्टीला होकार देते. ते स्वप्न पूर्ण होते की नाही, हे सिनेमातच कळेल. पण, या सिनेमाची मुख्य कथा ती नाही.

समाजात आजही बळी देण्याची अनिष्ट प्रथा रूढ आहे. या प्रथेच्या आडून चालणारे शोषण किती खालच्या थरावरचे आहे, मानवी विकार किती खालच्या पातळीचा आहे, हे समोर आणण्यासाठी मेंढ्याला देवाला सोडण्याची नि नंतर त्याची गरज संपल्यावर बळी देण्याची प्रथा इथे प्रतीक म्हणून वापरली आहे. प्राण्याऐवजी आपण सर्रास माणसाचा बळी देत असतो, मात्र त्याचं आपल्याला सोयरसुतक नसतं, कारण मरणारा आपल्या परिघातला नसतो. या सिनेमातील काही दृश्यांत अंगावर शहारे येतात. टोबीच्या शेजारच्या गावात राहणाऱ्या आनंद या मांस विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला पंचक्रोशीमध्ये सर्वात शक्तिमान आणि श्रीमंत माणूस व्हायचं असतं. त्यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार असतो. मात्र, दुर्दैवाने त्याच्या प्लॅनिंगमध्ये टोबीचा बळी जातो. सर्वांना वाटतं टोबी संपला. परंतु, वास्तव वेगळे असते. तो कसा परत येतो आणि परतल्यावर कसा सूड घेतो, हे पडद्यावर बघणेच इष्ट ठरेल. ‘कांतारा’नंतरचा हा अत्यंत प्रभावी कन्नड चित्रपट आहे. मात्र, याची फारशी चर्चा झाली नाही, कारण कांतारामधील भडकपणा आणि थरार यात नाही. हा चित्रपट सस्पेन्स, भयपटही नाही. समाज आणि शोषक यांचे बुरखे तटस्थतेने फाडत जाणारा, गावजीवनातील जनरीतींचा आणि समाजातील उच्च-नीच भेदभावाचा खरा चेहरा उघडा पाडणारा हा सिनेमा आहे. टोबीमध्ये अनेक प्लॉट पॉइंट आहेत, परिणामी शक्तिशाली क्रिसेंडोमध्ये त्याचे रूपांतर झाले आहे. यातील कथा खरी की खोटी, याविषयी भाष्य कुठे येत नाही. कुमठा नावाच्या एका छोट्याशा गावातील ही गोष्ट. टोबी हा मुका गरीब तरुण. त्याचं काम हिंसक आणि दुष्टपणाचं असलं, तरी त्याचं अंत:करण विशाल आहे. त्याला आवडणारी तरुणी नि त्याची मुलगी यांच्यावर त्यांचं जीवापाड प्रेम आहे. ‘कांतारा’मधील ऋषभ शेट्टीच्या वराह अंगी संचारलेल्या हरी या पात्राची आठवण यावी, असा एक सीन यात आहे, ज्यात टोबी अंगात मेंढा संचारल्यासारखा वागतो. टोबीची ‘आनंद गरुड गमना वृषभ वाहना’ ही स्थिती सिनेमाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाते. हा चित्रपट पूर्णत: अभिनेता राज बी. शेट्टीचा आहे. सावित्री, दामोदर, आनंद, जेनी ही सर्व पात्रे पटकथेत अत्यंत गोळीबंद पद्धतीने लिहिली आहेत. सर्वांचे अभिनय अत्यंत कसदार झालेत. परिणामी एखाद्या पॉवर ट्रीपचा अनुभव प्रेक्षकांना येतो. सिनेमाच्या तांत्रिक अंगाचा उल्लेख करणे अनिवार्य आहे. विशेषतः सिनेमॅटोग्राफर प्रवीण श्रिया आणि संगीतकार मिथुन मुकुंदन यांचे योगदान महत्त्वाचे आहे. पार्श्वसंगीत अत्यंत थरारक आहे. सिनेमाची प्रत्येक फ्रेम देखणी नि बघण्याजोगी झालीय, याचे श्रेय सिनेमॅटोग्राफरला आहे. कन्नड चित्रपटाने कात टाकल्याचे आपण अलीकडे पाहात आहोत. मराठी सिनेमात दशकांच्या अंतराने साचे बदलत गेले, पण त्यामध्येही तोच तोपणा होता. चौकटबंद परीघ मराठी सिनेमा मोडू शकला नाही. अगदीच सुरूवातीला आदर्शवादाचे सिनेमे होते, नंतर तमाशापट येत होते. पुढे बाष्कळ विनोदी सिनेमांचे पेव फुटले. त्यानंतरच्या काळात विविध विषयांवरचे सिनेमे येत गेले, पण सैराट वळता जागतिक स्तरावरती मराठी सिनेमाची दखल घ्यावी, असे ब्लॉक बस्टर सिनेमे मराठीत निर्मिले गेले नाहीत, हे वास्तव आहे. मराठीची शेजारीण असणाऱ्या कानडीने मात्र मोठी भरारी घेतलेली आहे. हे कसे शक्य झाले, यासाठी काय करावे लागले, याचा मराठी चित्रसृष्टीने अभ्यास केला पाहिजे. केजीएफ, कांतारा आणि आताचा टोबी हे तिन्ही चित्रपट कन्नड सिनेमाने कात टाकल्याचे प्रतीक होत. कन्नड सिनेमाने मल्याळी, तमिळ सिनेमापासून प्रेरणा घेत वास्तववादी प्लॉट निवडत सामाजिक, राजकीय भाष्य करताना मौन न स्वीकारता खणखणीत आसूड ओढण्याकडे कल ठेवला, हे विशेष आहे. अत्यंत उच्च आणि दर्जेदार चित्रपटमूल्ये, भव्य-दिव्य निर्मिती आणि वास्तववादी कथा हा मल्याळी सिनेमांचा प्लस पॉइंट कानडीनेही निवडला असल्यास त्यात नवल वाटण्याचे कारण नाही. डिस्नी हॉट स्टारवर आलेला टोबी हा त्याच परंपरेतील चित्रपट आहे. तो निराश करत नाही. अर्थात, हा चित्रपट प्रत्येकाला आवडेल, असे विधान करणे योग्य नाही. मात्र, ज्यांना सामाजिक विषयावरचे वास्तववादी भाष्य करणारे सिनेमे आवडतात, त्यांना टोबी नक्की आवडेल. वेगळ्या धाटणीचा सिनेमा काढण्यासाठी दिग्दर्शक बसिल शेलक्कल यांना धन्यवाद दिले पाहिजेत.

संपर्क : ९७६६८३३२८३ sameerbapu@gmail.com

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments